- बापू सोळुंके औरंगाबाद : शहरातील गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन करण्याचा विडा शहर पोलिसांनी उचलला आहे. चो-या, घरफोड्यांसोबत सशस्त्र हल्ला करणे, दहशत निर्माण करणा-या गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी त्यांच्याविरुद्ध तडीपार, मोक्का आणि एमपीडीएसारख्या कारवायांचे सत्र पोलिसांनी सुरू केले. चार महिन्यांत शहरातील तब्बल १३७ गुन्हेगारांना तडीपारीच्या नोटिसा पोलिसांनी बजावल्या असून, यापैकी ९१ गुन्हेगारांना शहरातून तडीपार करण्यात आल्याची माहिती समोर आली.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गुन्हेगारीमुक्त आणि देशातील सर्वाधिक सुरक्षित शहर म्हणून औरंगाबादची ओळख निर्माण करायची असल्याची माहिती पत्रकारांना दिली होती. त्यानंतर त्यांनी सर्व पोलीस यंत्रणेला कामाला लावले. प्रथम शहरातील टॉॅप-२० गुन्हेगारांचा मेळावा घेऊन त्यांना पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे आणि पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्यामार्फत गुन्हेगारी सोडा आणि सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगा, असा सल्लाही दिला. मात्र, त्यानंतरही अनेक गुन्हेगार सक्रिय असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
चोरी, घरफोडी करणे, लुटमार करणे, शस्त्राचा धाक दाखवून धमकावणे, दहशत निर्माण करणे, सशस्त्र हल्ला करणे, सरकारी कर्मचा-यांवर हल्ला करणे, गावठी दारू अड्डा, पत्त्याचे क्लब चालविणे, वेश्या व्यवसाय करणे, वाहने जाळून जनतेच्या मालमत्तेचे नुकसान करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांची नजर होती. परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत ५७ गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर होते.
वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात बदल न झाल्याने पोलीस ठाणेप्रमुखांनी सहायक पोलीस आयुक्तांमार्फत उपायुक्तांकडे त्यांच्याविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्याची विनंती केली. सहायक आयुक्तांनी चौकशी करून सादर केलेल्या प्रस्तावाच्या आधारे उपायुक्त ढाकणे यांनी २५ आॅक्टोबरपर्यंत ४८ जणांना पोलीस आयुक्तालय हद्दीतून तडीपार केले, तर ८ गुन्हेगारांचे प्रस्ताव विचारधीन आहेत. ६ गुन्हेगारांच्या तडीपारीच्या प्रस्तावावर सहायक पोलीस आयुक्त स्तरावर चौकशी करीत आहे.
यासोबतच परिमंडळ-२ अंतर्गत असलेल्या ७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सक्रिय असलेल्या ८० गुन्हेगारांना तडीपार करण्याचे प्रस्ताव संबंधित ठाणेप्रमुखांनी सादर केले आहेत. यापैकी ४८ गुन्हेगारांना शहरातून तडीपार करण्यात आल्याची माहिती उपायुक्त श्रीरामे यांनी दिली. ते म्हणाले की, उर्वरित गुन्हेगारांची चौकशी सुरू असून, त्यांच्या प्रस्तावावर लवकरच निर्णय होईल.
परिमंडळ-१ चे पोलीस ठाणे व तडीपार गुन्हेगारांची संख्या- सिटीचौक-०४- क्रांतीचौक ठाणे- ०५- बेगमपुरा ठाणे- ०३- छावणी ठाणे- ०७- एमआयडीसी वाळूज ठाणे- १३- वाळूज ठाणे- ०५- दौलताबाद ठाणे- ०१- वेदांतनगर ठाणे- ०३
परिमंडळ - २ मधील पोलीस ठाणे आणि गुन्हेगारांची संख्या- सिडको - १0- मुकुंदवाडी - ०३- एमआयडीसी सिडको -०२- उस्मानपुरा - ०४- सातारा - ०९- जवाहरनगर - ०९- हर्सूल - ०१- पुंडलिकनगर - ०६- जिन्सी - ०४
गुन्हेगारांवर कठोर कारवाई आवश्यकशहर पोलीस आयुक्तालयांतर्गत सक्रिय असलेल्या गुन्हेगारांना वारंवार संधी देऊनही गुन्हेगार वाईट मार्ग सोडत नसतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई हाच एकमेव उपाय असतो. पोलीस ठाणे स्तरावर अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही चोरी-घरफोडी, सामान्यांना मारहाण करणे, लुटमार करणे, शस्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाºया गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई केली जाते. मात्र कारवाईचा परिणाम न झालेल्या गुन्हेगारांवर तडीपार, एमपीडीए आणि मोक्कानुसार कारवाई केली जात आहे.- राहुल श्रीरामे, उपायुक्त, परिमंडळ-२