\Sट्रॅव्हल्सची दिवाळी : गर्दीमुळे, प्रवाशांच्या खिशाला कात्री
औरंगाबाद : ट्रॅव्हल्सने औरंगाबादहून नागपूरला जाण्यासाठी १४५०, तर मुंबईसाठी ८१० रुपये मोजावे लागत आहेत. बसच्या प्रकारानुसार वेगवेगळे भाडे आहेत. मात्र, ऐन दिवाळीत २० टक्क्यांपर्यंत झालेल्या भाडेवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसत आहे.
लॉकडाऊनमुळे तब्बल ५ महिने ट्रॅव्हल्स बसची चाके जाम झाली होती. परंतु राज्य सरकारने परवानगी दिली आणि ट्रॅव्हल्सची चाके २ सप्टेंबरपासून गतिमान झाली. आर्थिक संकटात सापडलेल्या ट्रॅव्हल्स व्यावसायिक आणि प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र, डिझेलची दरवाढ, कोरोनामुळे स्लिपर बसमधून २० प्रवासी, तर सिटींग बसमध्ये आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी अशी मर्यादित प्रवाशांची वाहतूक, मास्क, सॅनिटायझर आदींवरील खर्चामुळे प्रवास महागला. दोन महिन्यांनंतर आता कुठे रविवापासून (दि. ८) ट्रॅव्हल्स पूर्ण आसन क्षमतेने धावू लागल्या. पण आता दिवाळीचा सिझन सुरू झाला. त्यामुळे पुन्हा भाडेवाढीचा कालावधी. तुलनेत एसटीने दिवाळीतील भाडेवाढ रद्द केली आहे.
दरवर्षी आर्थिक भुर्दंड
दरवर्षी दिवाळीत ट्रॅव्हल्सने प्रवास करण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. इतर वेळी कमी पैसे लागतात. आता मात्र अधिक रक्कम द्यावी लागत आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक उत्पन्न कमी झाले आहे. त्यात असा फटका सहन करावा लागतो.
- प्रशांत गुडदे , प्रवासी
व्यावसायिक आर्थिक अडचणीत
ज्या बस औरंगाबादहून धावतात, त्याच्या तिकीट दरात फार वाढ झालेली नाही. औरंगाबादमार्गे जाणाऱ्या इतर शहरांतील बसचे दर अधिक दिसतात. दिवाळीमुळे २० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ झालेली आहे. परंतु अद्यापही पुरेसे प्रवासी नाहीत. त्यामुळे व्यावसायिक आर्थिक अडचणीत आहेत.
- पुष्कर लुले, सहसचिव, बस ओनर्स अँड ट्रॅव्हल्स एजंट्स वेल्फेअर असोसिएशन
चौकट..
प्रवासभाडे --दिवाळीपूर्वी-- सध्या ट्रॅव्हल्स-- एसटी
औरंगाबाद-पुणे --४०० ---५०० ---३००
औरंगाबाद -मुंबई --७०० ---८१० --- ६६५
औरंगाबाद-नागपूर -- १२०० --- १४५० ---९५०
औरंगाबाद-लातूर --५०० ---६०० --- ४४०
औरंगाबाद-सोलापूर --- ४०० --- ६०० ----४१५