घाटनांद्रा : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास १४ एप्रिलपासून सुरुवात झाली. आठ रोजे पूर्ण झाले आहे. सलग दुसऱ्या वर्षीही पवित्र रमजान महिन्यात संचारबंदी व शासनाचे निर्बंध असल्याने पुन्हा रोजे नमाज पठण घरीच होत असल्यामुळे मुस्लिम बांधवांचा हिरमोड झाला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजविला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने लॉकडाऊन लावले आहे. रमजान महिन्याला मुस्लिम समाजामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असते. समाजबांधव मशिदीमध्ये एकत्र येऊन नमाज व तरावीह पठण करून अल्लाहाकडे दुवा मागतात. या महिन्यात संपूर्ण दिवसभर उपवास (रोजे) ठेवणे. कुराण पठण अल्लाहाचे नामस्मरण व विशेष नमाज तरावीसह दिवसभरात पाच वेळची नमाज अदा केली जाते. पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांची गर्दी व उत्साह दिसून येतो. संचारबंदीमुळे दुसऱ्या वर्षीदेखील रमजान महिन्यातील कार्यक्रम रद्द झाले आहेत.