जालना: जिल्ह्यात अवेळी पडलेल्या पाऊस व गारपिटीमुळे १६९ शेडनेटधारक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खा. रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात २३ फेबु्रवारी ते १० मार्च या कालावधीत अवकाळी पाऊस व प्रचंड गारपीट झाली. त्यात शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेडनेटसह त्यातील भाजीपाला व इतर पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यामुळे शेडनेटधारक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मुळात या शेतकर्यांनी मोठी ओढाताण करीत, उधार-उसनवारी करीत, शेडनेट उभारल्या. मोठ्या जिद्दीने त्यातून भाजीपाल्यासह अन्य पिके फुलविली. त्यातून काही पदरात पडेल, असे अपेक्षित असतांना या शेतकर्यांना मोठी झळ पोहोचली आहे, असे दानवे म्हणाले. गारपीटग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत देण्यात आली. मात्र, त्यात शेडनेटधारकांचा समावेश नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे शेडनेटधारक शेतकर्यांना तात्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी) आपद्ग्रस्त शेतकर्यांना राज्य सरकारने मदतीचा निर्णय जाहीर केला. परंतु त्यात शेडनेटधारकांचा उल्लेख नाही. मुळात शेडनोटधारकांचे पन्नासटक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळेच सरकारने खास बाब म्हणून धोरणात्मक निर्णय घ्यावा व मदत जाहीर करावी, अशी मागणी दानवे यांनी केली.
शेडनेटधारकांना नुकसान भरपाई द्या
By admin | Updated: May 14, 2014 23:57 IST