लातूर : दुष्काळ दौऱ्यावर आलेले सत्ताधारी व विरोधी बाकावरील नेते एकमेकांवर टीका करून ‘पर्यटन दौरा’ करून गेले. शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही. सिनेअभिनेत्यांनी मात्र सामाजिक बांधिलकीतून मदतीचा उपक्रम हाती घेतला आहे. मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देऊन जगण्याचा विश्वास आणि निर्धार ते देत आहेत. सिनेअभिनेते नाना पाटेकर आणि मराठवाड्याचे सुपुत्र मकरंद अनासपुरे व त्यांच्या सहकारी कलावंतांनी बीडमध्ये आत्महत्या केलेल्या ११२ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १५ हजारांची मदत नुकतीच दिली आहे. आता या अभिनेत्यांनी लातूर, नांदेड आणि औरंगाबादचा दौरा हाती घेतला आहे. ५ सप्टेंबर रोजी दगडोजीराव देशमुख सभागृहात हे दोघे आणि त्यांचे सहकारी कलावंत लातुरात येत आहेत. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ते धीर देणार आहेत. लातूर जिल्ह्यातील ८७ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील २६ शेतकऱ्यांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून गळफास आवळला. त्यांच्या कुटुंबाला हे दोघे आता भेट देणार आहेत. नुसती भेटच नाही, तर त्यांना जगण्याचे बळही देणार आहेत. त्याबरोबर प्रत्येकी १५ हजारांची मदतही देण्याचे नियोजन आहे. मार्केट यार्डातील दगडोजीराव देशमुख सभागृहात दुपारी २ ते ५ या तीन तासांच्या कालावधीत या कुटुंबांशी ते स्नेहबंध जोडणार आहेत. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या कुटुंबांना थेट आणि रोख मदत आम्ही करणार आहोत. आम्ही येतोय, तुम्ही पण या. शेतकऱ्यांना बळ देऊया, असे अपील नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी जनतेलाही केले आहे.लातूर येथे ५ सप्टेंबर रोजी ते शेतकऱ्यांशी हितगुज केल्यानंतर नांदेडला ६ आॅगस्ट रोजी जाणार आहेत. नांदेड येथील कुसुम सभागृहात आणि औरंगाबादेत सिडको नाट्यगृह येथे शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. लातूरसह या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ते मदत करणार आहेत.
चला, आपले तीन तास सामाजिक बांधिलकीसाठी...
By admin | Updated: September 4, 2015 00:31 IST