जालना : परीक्षा केंद्राच्या परिसरात १०० मीटरपर्यंत परीक्षार्थी व नियुक्त अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षक यांच्या व्यतिरिक्त इतरांना मज्जाव असतो. तसा फलकही केंद्राच्या बाहेर लावला जातो. परंतु सद्यस्थितीत परीक्षा केंद्रांवर ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती दिसून येत आहे. ‘लोकमत’ चमूने शुक्रवारी स्टींग च्या माध्यमातून हा सर्व गैरप्रकार चव्हाट्यावर आणला. परीक्षेसाठी असणारे सर्व नियम केवळ फलकावरच दिसून आले.डॉ.बाबासाहेब आंबेडेकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षेला सुरूवात झाली आहे. या परीक्षेत सर्रासपणे गैरप्रकार आणि नियमांना धाब्यावर बसविले जात असल्याचे उघडकीस आले आहे. जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील परीक्षा केंद्रातील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर जालना शहरातील परीक्षा केंद्रांची शुक्रवारी लोकमत चमूने पाहणी केली. यामध्ये अनेक गैरप्रकारांचा उलगडा काही महाविद्यालयांमधून झाला.विशेष म्हणजे परिसरात परीक्षार्थींशिवाय कोणालाही येण्यास बंदी असते. त्यासाठी परिसरात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला असतो. परंतु शहरातील महाविद्यालयांच्या परिसरात ना पोलीस बंदोबस्त होता, ना कोणाला येण्यास मज्जाव करण्यात आला होता. कोणीही यावे, अन् परीक्षार्थीशी बोलून जावे, अशीच परिस्थिती दिसून आली.
आओ जाओ घर तुम्हारा!
By admin | Updated: October 15, 2016 00:40 IST