औरंगाबाद : शहराच्या किमान तापमानात रोज घसरण सुरू आहे. चिकलठाणा वेधशाळेत मंगळवारी १२.५ एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली.
सध्या वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत आहेत. परिणामी, थंडी वाढते आहे. मराठवाड्यात यंदा मागील वर्षीपेक्षा जास्त थंडी असेल. कारण पाऊस जास्त झाला आणि त्यामुळे जमिनीत पाण्याचा अंश जास्त आहे, हे शास्त्रीय कारण त्यामागे आहे. दिवसा ‘नोव्हेंबर हीट’ आणि रात्री ‘कोल्ड शाॅक’ असे वातावरण राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली.
हवामानतज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे म्हणाले, दिवसा काहीसा उकाडा आणि साधारणपणे सायंकाळी ४.३० वाजेनंतर तापमानात वेगाने घसरण आणि रात्री तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा खाली, असे नोव्हेंबरमध्ये नवीन वातावरण अनुभवायला मिळणार आहे.