उस्मानाबाद : शहराच्या प्रत्येक भागातील स्वच्छतेबाबत नगरपालिकांनी तातडीने पावले उचलावीत. नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत जागृती करावी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत. प्रत्येक वॉर्डात नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छता समित्या कार्यान्वित झाल्या नसतील तर त्याचा अहवाल सादर करा. यापुढे परिसर स्वच्छतेबाबत दिरंगाई करणाऱ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता मार्शल नेमण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक नगर पालिकांच्या स्वच्छतेबाबत केलेल्या कार्यवाहीच्या मूल्यमापनासाठी एकमेकांच्या कार्र्यक्षेत्रात संबंधितांना तपासणीसाठी पाठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात शहर स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत डॉ. नारनवरे यांनी सर्व नगरपालिका मुख्याधिकारी यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, नागरी विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक कुरवलकर आदींची यावेळी उपस्थिती होती.नगरपालिकांनी अजूनही नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत कार्यवाही केलेली नाही. नागरिकांमध्ये जागृती करुन ओला व सुका कचरा वेगळा गोळा करण्याबाबतची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शहर स्वच्छतेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य प्रशासकीय पातळीवर केले जाईल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. दोन-तीन नगरपालिकांनी मिळून घनकचरा व्यवस्थापनाबाबत एकत्रित प्रकल्प सुरु करता येईल का. याची माहिती घेऊन कार्यवाही करण्याबाबत सुचित केले. कचरा विलगीकरण ही आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे नगरपालिकांनी याचा पाठपुरावा करावा, असे स्पष्ट निर्देशह त्यांनी दिले.कचरा संकलित करण्याबाबत नियमित कार्यवाही करावी. व्यापारी आस्थापनांकडून सशुल्क कचरा संकलन करावे. प्रत्येक वॉर्डमध्ये स्वच्छता कमिटी कार्यान्वित झाल्या नसतील तर नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी तसा अहवाल पाठवावा. संबंधित वॉर्डमध्ये अस्वच्छता निर्माण झाली तर त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पालिका क्षेत्रात ‘स्वच्छता मार्शल’
By admin | Updated: July 10, 2014 00:59 IST