लातूर : दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्यातील ‘क’ वर्ग दर्जा असलेल्या नगरपालिका क्षेत्रात रोजगार हमी योजनेची कामे अनुज्ञेय आहेत. मात्र लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगरपालिका क्षेत्रात ही कामे अद्याप सुरू केली नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना आदेश देऊनही मजूर नोंदणी, कामाचा सेल्फ, अंदाजपत्रक आदी कुठलीच कारवाई नाही. अहमदपूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून शासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार तालुक्यात व नगरपालिका क्षेत्रांत रोजगार हमी योजनेची कामे करावीत म्हणून अहमदपूर पालिकेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती व काही नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. परंतु, अद्याप प्रशासनाने रोहयोची कामे सुरू केली नाहीत. अहमदपूर शहरातील खूप मोठा मजूरवर्ग कामाच्या प्रतीक्षेत आहे. हाताला काम मिळत नसल्यामुळे मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नगरसेवक डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. अहमदपूर शहर व तालुक्यात सध्या बांधकामाची कामे पाण्याअभावी ठप्प आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. परिणामी, हे मजूर स्थलांतर करीत आहेत. हे स्थलांतर टाळण्यासाठी शहरात न.प. अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे होणे आवश्यक आहे. तसे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. मात्र या आदेशाकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे कामे सुरू नाहीत, असे नगरसेवक डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अहमदपूर नगरपालिका क्षेत्रात खास बाब म्हणून रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून मजुरांना काम उपलब्ध करून द्यावे. तसेच आदेश देऊनही कामे उपलब्ध करून न देणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई करावी, असेही नगरसेवक डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.
‘क’ वर्ग दर्जा न.प.ला रोहयोची कामे अनुज्ञेय
By admin | Updated: November 19, 2015 00:23 IST