परभणी: शहर महानगरपालिकेतील कर्मचारी चार दिवसांपासून संपावर गेल्याने शहरातील स्वच्छतेची कामे ठप्प झाली आहेत. दरम्यान, प्रशासनाने दखल न घेतल्याने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.थकलेला पगारासह इतर अनेक मागण्यांसाठी मनपा कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यावेळच्या संपात मनपातील सर्वच कर्मचारी, अधिकारी सहभागी झाल्यामुळे कामे ठप्प झाली आहेत. स्वच्छता, दिवाबत्ती, पाणीपुरवठा ही कामे अत्यावश्यक सेवेत मोडतात. परंतु कर्मचारी संपात असल्याने ही कामे ठप्प झाली आहेत. शहरात सकाळच्या वेळी होणारी स्वच्छताही होत नसल्याने घाणीत वाढ झाली आहे.दरम्यान, के़ के़ आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली़ त्यात २१ जुलै रोजी परभणी शहर महानगरपालिकेतील कर्मचारी शनिवार बाजार येथून मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील़ तर नगरपालिकेतील कर्मचारी तहसीलवर मोर्चा काढतील़ २२ जुलै रोजी शहर मनपातील कर्मचारी खासदारांच्या कार्यालयासमोर आणि नगरपालिकेचे कर्मचारी त्या त्या मतदारसंघाच्या आमदारांच्या कार्यालयासमोर निर्दशने करतील़ २३ जुलै रोजी रास्ता रोको व जेलभरो आंदोलन, २४ रोजी शासनाचा निषेध म्हणून मुंडन आंदोलन, २५ जुलै रोजी बोंब मारून व नंतर तोंडाला पट्टी लावून मुक आंदोलन करण्यात येईल़ शासनाने मागण्या मान्य न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आला़ मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनावर आनंद मोरे, मुक्तशीद खान, अनुसयाबाई जोगदंड, के़ के़ भारसाखळे, अशोक शिंदे, एस़ एस़ पालकर, परमेश्वर पारधे, नजम खान, सुनिता अहिरे, अय्युब खान, आऱटी़ मानकर, डी़ व्ही़ तळेकर, राम कांबळे, रमेश बारहाते, नागनाथ पोटुळे, नागनाथ साळवे, उत्तम कांबळे आदींची नावे आहेत़ (प्रतिनिधी)कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज मनपातील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न महत्त्वाचा आहे. मनपातील कर्मचाऱ्यांचा चार-पाच महिन्यांपासून पगार थकलेला आहे. प्रशासनाने अजूनपर्यंत कुठलाही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.शासन व प्रशासनाने या प्रश्नावर सकारात्मक पावले उचलून कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. सध्या तरी कर्मचाऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
शहर स्वच्छता ठप्प
By admin | Updated: July 21, 2014 00:27 IST