लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील अस्वच्छतेच्या परिस्थितीस तत्कालीन आयुक्त समीर उन्हाळे हेच जबाबदार असल्याचा ठपका बुधवारी महापालिकेत झालेल्या शहर स्वच्छतेच्या आढाव्यात ठेवण्यात आला.शहरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिकेत महापौर शैलजा स्वामी यांनी बैठक घेतली. या बैठकीस नगरसेवकांनाही बोलावण्यात आले होते. तत्कालीन शहर स्वच्छता कंत्राटदार ए टू झेडने महिनापूर्वीच मार्चअखेर आपले काम पूर्ण होत असून आपण काम थांबवणार असल्याची सूचना मनपा प्रशासनास दिली होती. मात्र शहर स्वच्छतेची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सदर कंत्राटदाराचे काम चालू ठेवणे आवश्यक होते. मात्र असे न करता तत्कालीन आयुक्तांनी एटूझेडला कार्यमुक्त केले. त्यामुळेच आज ही परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे संपूर्ण शहराचे आरोग्य वेठीस धरले आहे. याबाबत महापौर स्वामी यांनी तत्कालीन आयुक्त उन्हाळे यांची मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. येत्या दोन दिवसांत शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे नूतन आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले. उपस्थित नगरसेवकांनी मनपा प्रशासनामुळे आम्हाला प्रभागात निघणेही अवघड झाल्याचे सांगितले. बैठकीस सभापती मंगला देशमुख, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार, अनुजा तेहरा, विजय येवनकर, संजय मोरे, सतीश राखेवार, डॉ. करुणा जमदाडे, किशोर यादव, शेर अली, बावजीर, किशोर भवरे, उमेश चव्हाण आदींची उपस्थिती होती.
शहर अस्वच्छतेचे खापर उन्हाळेंच्या माथ्यावर
By admin | Updated: June 15, 2017 00:16 IST