लातूर : केवळ दगडवाडीच नव्हे, तर जिल्हाभरातील अनेक स्वस्त धान्य दुकानदारांचा घोळ समोर येत आहे. ‘लोकमत’ने दगडवाडी प्रकरणाच्या अनुषंगाने प्रकाश टाकल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तपासणी गंभीरपणे सुरू केली असून, घोळ करणाऱ्या चार दुकानदारांचा परवाना रद्द केला असून, तिघांचा परवाना निलंबित केला आहे. तर पाच जणांची अनामत रक्कम जप्त केली आहे.धान्य जादा दराने विक्री करणे, बीपीएल व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना नियमानुसार वाटप न करणे, भाव फलक व साठा फलक न लावणे, सदस्य संख्या कमी असताना जास्त सदस्य संख्या दाखविणे, सदस्य संख्या १२८ असताना १९२ चे धान्य उचलणे, शिधापत्रिकाधारक गावचे रहिवासी नसणे, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या नावे धान्य उचलणे असे प्रकार स्वस्त धान्य दुकानदारांकडून होत आहेत. अहमदपूर तालुक्यातील दगडवाडी येथे अन्नसुरक्षा योजनेतील यादीत शासकीय कर्मचारी होते. एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या योजनेत धान्यांचा लाभ दिल्याचे आढळून आल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने स्वस्त धान्य दुकानदारांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत दुकान परवान्याचे निलंबन, परवाना रद्द करणे व अनामत रक्कम जप्त करण्याच्या कारवाईला प्रारंभ केला आहे. आतापर्यंत ११ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. १० मार्चपासून प्रत्येक गावात चावडी वाचनाद्वारे लाभार्थ्यांच्या यादीचे वाचन होणार आहे. यादी वाचनात दोष आढळल्यानंतर संबंधित दुकानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील दहाही तहसीलदारांना स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी सुनीलकुमार यादव यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)
स्वस्त धान्य दुकानदारांचा घोळ !
By admin | Updated: March 2, 2015 00:53 IST