अंबड : स्वस्त धान्य वाटपामध्ये मोठा भ्रष्टाचार घडल्याचा प्रकार तालुक्यातील वडीगोद्री येथे उघडकीस आला आहे. माजी जि.प.सदस्य देवीदास खटके यांनी माहितीच्या अधिकारात सदर प्रकार उघडकीस आणला आहे. याविषयी वडीगोद्री येथील चारही स्वस्त धान्य दुकानदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.तहसीलदारांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वडीगोद्री येथे एकूण चार स्वस्त धान्य दुकाने आहेत. या चार दुकानांच्या माध्यमातून गावातील रहिवासी नागरिकांना स्वस्त धान्य वाटप करण्यात येते. चारही रेशन दुकानांच्या लाभार्थ्यांच्या याद्यांमध्ये मोठा घोळ घालण्यात आला आहे. धान्य वाटपात मोठऱ प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे माहिती अधिकारातंर्गत उघड झाले आहे. देवीदास खटके, बाबासाहेब गावडे व बाबासाहेब आटोळे यांनी माहिती अधिकारातंर्गत वडीगोद्री येथील स्वस्त धान्य वाटपप्रणालीविषयी माहिती मागविली. यावेळी अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. गावातील अनेक कुटुबांचा सर्वच चारही स्वस्त धान्य दुकानांच्या यादीत समावेश आहे. काही व्यक्तींचे एकाच यादीत चार ते पाच ठिकाणी नावे आहेत. गावातील रहिवासी नसलेल्या इतर गावातील नागरिकांचा वडीगोद्री येथील स्वस्त धान्य दुकानांच्या यादीत समावेश आहे. काही लाभार्थ्यांच्या नावांमध्ये हेतूपुरस्सर चुका घडविण्यात आलेल्या आहेत. यापैकी काही याद्यांमध्ये अस्तित्वातच नसलेल्या व्यक्तींच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.कहर म्हणजे स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य वाटप रजिस्टरमध्ये अनेक वर्षांपूर्वी मयत झालेल्या नागरिकांना मागील काही माहिन्यांत धान्य वाटप करण्यात आल्याचे दाखविले आहे. अशा विविध मार्गे वडीगोद्री येथील स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य वाटपात कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे. याप्रकरणी संबंधित दुकानदारांवर कडक कारवाई करत सर्व दुकानांचे परवाने रद्द करावे, अशी मागणी तहसीलदार सावंत यांच्याकडे देवीदास खटके यांनी केली आहे.याद्यातील मुद्दाम ठरवून करण्यात आलेल्या घोळामुळे या भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी असल्याचा अंदाज आहे. याद्यांतील गोंधळामुळे गावातील स्वस्त धान्य लाभार्थ्यांची खरी संख्येचा अंदाजच येत नाही. अस्तित्वातच नसलेल्या, मयत झालेल्या, गावचे रहिवासी नसणाऱ्या आदी व्यक्तींना धान्य वाटप करत असल्याची नोंदी या दुकानदारांच्या दस्तावेजात आहेत. तसेच काही कुटुंबांचा चारही स्वस्त धान्य दुकानदारांच्या यादीत समावेश असल्याने मागील कित्येक वर्षांपासून बोगस लाभार्थींना करण्यात आलेले स्वस्त धान्य नेमके गेले कुठे हा प्रश्न होतो.मागील कित्येक वर्षात गायब करण्यात आलेले कोट्यवधी रुपयांचे धान्य दुकानदारांनी धान्यमाफियांच्या माध्यमातून काळ्या बाजारात विकल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. याप्रकरणी संबधित स्वस्त धान्य दुकानदारांवर वेगवेगळ्या प्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याची मागणी देवीदास खटके, बाबासाहेब गावडे व बाबासाहेब आटोळे यांनी केली आहे. (वार्ताहर)धनाढ्य व्यक्तींचा दारिद्रय रेषेखालील व्यक्तींच्या यादीत समावेश असल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील वडीगोद्री येथे उघडकीस आला आहे. माहिती अधिकारात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींसाठीच्या अनेक योजनांचा लाभ या कथित प्रतिष्ठितांनी घेतला असल्याचेही उघड झाले आहे.वडीगोद्री येथील माजी जि.प.सदस्य देविदास खटके, बाबासाहेब आटोळे, बाबासाहेब गावडे यांना दारिद्र्य रेषेखालील नागरिकांच्या यादीबाबत संशय आल्याने त्यांनी याविषयी अंबड तहसील कार्यालयात माहिती अधिकारांतर्गत गावातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांच्या यादीची मागणी केली. यादी हाती आल्यानंतर यादीत गावातील अनेक धनाढ्यांची नावे पाहून अनेक जण चक्रावले. धनाढ्यांची नावे चुकून यादीत आली असतील असे वाटल्याने यादीत नाव असणाऱ्या कथित प्रतिष्ठितांनी दारिद्रय रेषेखालील नागरिकांसाठी असणाऱ्या योजनांचा लाभ घेतला का, याविषयी त्यांनी चौकशी केली. केवळ दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी असणाऱ्या अनेक योजनांचा लाभ गावातील संबधित धनाढ्यांनी घेतल्याचे लक्षात येताच या नागरिकांची नावे दारिद्रय रेषेखालील नागरिकांच्या यादीत चुकून गेलेली नसून ठरवून केलेल्या भ्रष्टाचाराचा हा प्रकार असल्याचे उघड झाले. गरीब नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी व सामाजिक समानतेच्या दृष्टिकोनातून शासनातर्फे दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. यामध्ये आरोग्य सेवेत सवलत, इंदिरा आवास योजना, राजीव गांधी आवास योजना, समाजकल्याण खात्याच्या विविध योजना, वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, निराधार सहाय्य योजना आदी योजनांमध्ये प्राधान्य तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत २ रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने स्वस्त धान्य आदी विविध सवलती व योजनांमध्ये प्राधान्य देण्यात येते. यासाठी सर्व्हे करुन दारिद्र्य रेषेखालील नागरिकांची यादी तयार करण्यात येते. मात्र यादी तयार करतानाच यामध्ये काही ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे. काही धनाढयांनी यादीत आपल्या नावांचा समावेश करुन घेतल्याचे घेण्यात आलेल्या माहितीतून समोर आले आहे.
स्वस्त धान्य वाटपात गैरप्रकार
By admin | Updated: July 21, 2014 00:24 IST