कडा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिला दांड्याने मारहाण करीत चाकूने शरीरावर सपासप वार केल्याची घटना आष्टी तालुक्यातील अंभोराजवळील गायकवाड वस्तीवर रविवारी मध्यरात्री घडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राणी विश्वास गायकवाड असे त्या मयत महिलेचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील गायकवाड वस्तीवर राहत असलेले विश्वास मुरलीधर गायकवाड यांचा विवाह दोन वर्षापूर्वी कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील राणी हिच्याशी झाला होता. त्यांना तीन महिन्यांचे बाळ आहे. ती काही कारणास्तव सासरी राहत नव्हती. दिवाळीच्या सणासाठी राणीला सासरी आणले पण तिच्या हातावर मेहंदी काढली होती. ही मेहंदी कोणी काढली ? असा प्रश्न पतीने विचारताच, तिने दाजीनी काढली असे सांगितल्याने कुरबूर सुरू झाली. ही कुरबूर टोकाला जाऊन तिच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने रविवारच्या मध्यरात्री तिला लाकडी दांड्याने मारहाण करून घायाळ केले व धारदार शस्त्राने वार करून खून केला. आरोपीला अंभोरा पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली आहे. आरोपी विश्वास मुरलीधर गायकवाड हा शेतीचा व्यवसाय करतो. दरम्यान, मयत राणी हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अहमदनगर येथे पाठविले आहे. (वार्ताहर)आष्टी तालुक्यातील अंभोरा ठाणे हे अहमदनगरच्या हद्दीजवळ आहे. अंभोराजवळ असणाऱ्या गायकवाड वस्तीवर हा थरार रविवारी मध्यरात्री घडला.४मात्र, याची माहिती अधीक्षक कार्यालयाला सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मिळाली नव्हती. एवढी मोठी घटना घडूनही याची माहिती अंभोरा पोलिसांनी वरिष्ठांना का कळविली नाही ? यावर संभ्रम निर्माण झाला आहे.४अंभोरा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गुन्हा दाखल झाल्यानंतर याची माहिती मुख्य कार्यालयास कळविण्यात येणार होती. मात्र, कोणतीही गंभीर घटना घडल्यास त्याची तात्काळ माहिती अधीक्षक कार्यालयास कळविणे आवश्यक आहे.४अंभोरा पोलिसांनी सकाळी आरोपीला ताब्यात घेतले होते. मात्र, याची माहितीही अधीक्षक कार्यालयाला नव्हती. याचे कारण गुलदस्त्यात आहे.
चारित्र्य संशयावरून खून
By admin | Updated: November 17, 2015 00:32 IST