बीड : अहमदनगर- बीड- परळी रेल्वेमार्गाचे काम दोन दशकांपासून रेंगाळलेले आहे. केंद्रात अन् राज्यात भाजपाचे सरकार आहे. यावेळी भरीव निधीची तरतूद व्हावी, यासाठी बुधवारी खा. प्रीतम मुंडे यांच्यासह शिष्टमंडळ रेल्वेमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती आ. विनायक मेटे यांनी सोमवारी येथे पत्रकारपरिषदेत दिली.माजी आ. जनार्दन तूपे, साहेबराव दरेकर, रेल्वे कृती समितीचे नामदेवराव क्षीरसागर, राजेंद्र मस्के, दिलीप गोरे, गणेश वरेकर, विजयकुमार पालसिंगणकर उपस्थित होते. आ. मेटे म्हणाले, १९९५ मध्ये रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली होती. तेंव्हाचा रेल्वेमार्ग ३५३ कोटींचा होता; पण आता २०१९ कोटी इतक्या रुपयांची आवश्यकता निर्माण झाली आहे. आतापर्यंत केवळ ३१० कोटी रुपये मिळाले आहेत. केंद्राने यावेळच्या रेल्वेअर्थसंकल्पात बीडच्या रेल्वेमार्गासाठी जास्तीजास्त तरतूद करणे आवश्यक आहे.यासाठी रेल्वमेंत्री सुरेश प्रभू यांना खा. प्रीतम मुंडे, रेल्वेकृती समितीचे पदाधिकारी, रेल्वेआंदोलनात सहभागी कार्यकर्ते यांचे शिष्टमंडळ भेटणार आहे.प्रभू यांनी बुधवारी दुपारची वेळ दिली असल्याचेही मेटे म्हणाले. ते महाराष्ट्रातील आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)आ. विनायक मेटे यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासोबत बैठक घेऊन रेल्वेकामाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी रेल्वेअधिकारी, भूसंपादन अधिकारी उपस्थित होते. रेल्वेच्या कामासाठी कालावधी निश्चित करुन स्वतंत्र कार्यालय उघडावे अशी मागणी यावेळी मेटे यांनी केली.
रेल्वेमार्गासाठी केंद्राकडे भरीव निधी मागणार
By admin | Updated: February 10, 2015 00:32 IST