नांदेड : शहरातील देगलूर नाका परिसरातील मुख्य रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहे़ त्यामुळे महामंडळाच्या बसेस व इतर जड वाहने शहरातून धावत असून अपघातात अनेकांना जीवही गमवावा लागला आहे़ त्यात गुरुवारी रात्री भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने एका दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली़देगलूर नाका ते हिंगोली गेट ओव्हरब्रीज दरम्यान रस्त्याचे काम हाती घेण्यात आले़ या ठिकाणी ड्रेनेज आणि जलवाहिनीसाठी चांगला रस्ताही खोदण्यात आला़ परंतु या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहे़ त्यामुळे बसेस व इतर जड वाहनांना शहरातून जावे लागत आहे़ त्याचा परिणाम म्हणून शहरात दररोज वाहतुकीचा खोळंबा होत असून अपघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे़ गुरुवारी रात्री लोहा तालुक्यातील खानापूरकर येथील राजू उत्तमराव खानापूरकर हा इतर मित्रांसह दुचाकीवरुन देगलूर नाका परिसरातून रात्री नऊ वाजेच्या सुमारास जात होता़ यावेळी बिलोली-अकोला जाणाऱ्या बस क्रमांक एम़एच़२० बीएल-२०५६ ने राजू खानापूरकर याला चिरडले़ यावेळी राजूचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे़ त्यानंतर घटनास्थळी इतवारा पोलिसांनी धाव घेवून जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल केले़ भाग्यनगर, तरोडा नाका, व्हीआयपी रस्ता आदी मुख्य रस्त्यावर भरदिवसा जड वाहने सुसाट धावत आहेत़ याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे़ (प्रतिनिधी)
बसने तरुणाला चिरडले
By admin | Updated: August 9, 2014 00:40 IST