राजकुमार जोंधळे/सितम सोनवणे , लातूरस्पर्धेच्या युगात शिक्षण क्षेत्रात मोठी जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे़ या स्पर्धेतूनच शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे मात्र दिवसेंदिवस वाढत आहे़ स्मार्ट जमान्यात शिक्षणही स्मार्ट झाले पाहिजे़ यासाठी राज्याचे शालेय विभागाकडून या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी समिती स्थापन करुन शासनाने निर्णय घेतला़ या निर्णयाची अंमलबजावणी मात्र जिल्हा प्रशासनाकडून होत नसल्याचे ‘लोकमत’च्या रिअॅलिटी चेकमध्ये शनिवारी समोर आले़ परिणामी, प्रशासनाच्या दिरंगाई व अपयशी कारभारामुळे चिमुकल्यांना दप्तरांचे ओझे वाहवे लागत आहे़ शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हे त्याच्या वजनापेक्षा १० टक्क्याहून अधिक असू नये, असा शासन निर्णय आहे़ त्यासंबंधी शाळा, पालक आणि शासनाने काय उपाययोजना आखल्या पाहिजेत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे़ शनिवारी ‘लोकमत’ने केलेल्या रिअॅलिटी चेकमध्ये आजही लातुरातील बहुतांश मराठी, उर्दु आणि इंग्रजी शाळांमध्ये या शासन निर्णयाला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे चित्र दिसून आले़ वेळेवर दप्तरांच्या ओझ्याबाबत योग्य तो निर्णय शाळांनी नाही घेतला तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे प्रश्न भविष्यात अधिक बळावतील, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले़ ‘लोकमत’ चमुने शनिवारी लातूर शहरातील काही शाळा गाठत थेट विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे तपासण्याची मोहीम ‘लोकमत’ रिअॅलिटी चेकच्या माध्यमातून हाती घेतली़ या मोहिमेत विद्यार्थ्यांवर दप्तराच्या ओझ्यामुळे नेमके काय काय परिणाम होतात याचा शोध घेतला़ प्रामुख्याने पाठीवर असणाऱ्या दप्तराच्या ओझ्यामुळे आरोग्याचे प्रश्न पुढे आले आहेत़ विद्यार्थ्यांच्या या आरोग्याकडे शासन, प्रशासन व्यवस्थापन आणि पालकाचे सर्रासपणे दुर्लक्ष होताना दिसून आले़ ४‘मुकी बिचारी कुणीही हाका’ अशीच परिस्थिती मराठी, उर्दु, इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांची झाली आहे़ विद्यार्थ्याच्या पाठीवर वाढणाऱ्या दप्तराच्या ओझ्याबाबत शासनाने ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला़ मात्र या निर्णयाला शाळा आणि प्रशासनाने कोलदांडा घातला आहे़ ४विद्यार्थ्यांच्या पाठीवर वाढणाऱ्या दप्तरांच्याा ओझ्याला अभ्यास मंडळ जबाबदार आहे़ या अभ्यास मंडळामार्फत पुरविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त अधिक वह्या, जाड पुठ्ठ्यांच्या फुलस्केप वह्या, प्रयोग वह्या, अनावश्यक लेखन साहित्य, स्वाध्याय पुस्तिका, अधिक वजनाचे कंपास बॉक्स, पिण्याच्या पाण्याची बॉटल, टिफीन आदी साहित्य दररोज विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन वावरावे लागते़ याबाबत कोणाकडे तक्रार करण्याची मुभा त्यांना नसते़ मुकाटपणे हे ओझे पाठीवर वाहवे लागते़ इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांच्या ओझ्यामुळे मुलांचे दुखणे वाढल्याचे पुढे आले आहे़ बऱ्याचदा मुले पाठ आणि कंबर दुखत असल्याची तक्रार पालकांकडे करतात़ मात्र या मुलांच्या दुखण्याकडे पालक फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे ‘लोकमत’च्या रिअॅलिटी चेकमधून समोर आले आहे़ विशेष म्हणजे अभ्यासक्रमाबरोबर आरोग्यही महत्वाचेच आहे़
चिमुकल्यांच्या खांद्यावर दप्तरांचे ‘ओझे’
By admin | Updated: December 19, 2015 23:51 IST