कळंब : शहरातील सर्वे क्र. १०७ मधील व्यापारी व नागरिकांचे विद्युत कनेक्शन न्यायालयाच्या आदेशानुसार आज वीज वितरण कंपनीने तोडले. यामुळे या भागातील जवळपास ८० दुकाने व घरे अंधारात राहणार आहेत. कळंब शहरातील सर्वे क्र. १०७ मधील एक एकर जागेबद्दल कळंब कृषिउत्पन्न बाजार समिती व माधव कुलकर्णी यांच्यामध्ये वाद होता. हे प्रकरण सुप्रिम कोर्टापर्यंत गेले होते. या जमिनीचा निकाल कुलकर्णी यांच्या बाजुने लागला होता. या भुखंडावर सध्या १०९ जणांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीने हे भुखंड भाडे करारावर दिले होते. या भुखंडावरील दुकाने व घरांना न. प. ने नळ कनेक्शन तसेच वीज कंपनीने वीज कनेक्शनही दिले आहेत. या जमिनीचा ताबा आपल्याला मिळावा, यासाठी कुलकर्णी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी उस्मानाबाद न्यायालयाने या भुखंडावरील बांधकामाचा पाणीपुरवठा तसेच वीजपुरवठा तोडण्याचे आदेश न. प. ला व वीज कंपनीला दिला होता. यानुसार आज या भागातील ८० जणांना वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने खंडित केला आहे. त्यामुळे या भागातील सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. आता याप्रकरणी कृषि उत्पन्न बाजार समिती काय भूमिका घेते? याकडे या भागातील व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)कळंब बाजार समिती परिसरातील सर्वे क्र. १०७ मधील भुखंडावरील कार्यवाहीबाबत न्यायालयाच्या आदेशासंदर्भाने काहीजण आज आपल्याकडे आले होते. परंतु त्यांना काय सहकार्य हवे आहे, त्याबाबत लेखी देण्याची विनंती आपण केली होती. परंतु त्यांनी आपल्याला लेखी काहीच न दिल्याने बाजार समिती प्रशासनानेही त्यांना काही लेखी दिले नाही. त्या परिसरात कोणी काय कार्यवाही केली? याबाबत आपल्याकडे काही माहिती नाही, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक बनसोडे यांनी दिली.
८० जणांचा वीजपुरवठा तोडला
By admin | Updated: December 4, 2014 00:52 IST