बनोटी लघु प्रकल्पातून बनोटी, वाडी, पळशी, वरठाण व मुखेड शिवारातील पिकांना तीन आवर्तने दिली जातात. मात्र, बनोटी कालव्याच्या गेटचा कनेक्टेड रॉड तुटल्याने गेट खुले झाले नाही. त्यामुळे पूर्ण क्षमतेने कालव्यात पाणी सोडले जात नसल्याने पाटातील पाणी शेतापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे रब्बी पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने रब्बी पिकेही माना टाकू लागली आहेत.
१५ डिसेंबर रोेजी पहिले आवर्तन सोडले जाणार असल्याने पाणीपट्टी वसुली करण्यात आली. शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने रब्बी हंगामाची तयारी करीत रब्बीचा पेरा केला. त्यानंतर पाणी सोडण्यासाठी प्रकल्प अधिकारी गेट उघडण्यासाठी गेले. मात्र कालव्याच्या गेटचा कनेक्टेड राॅड तुटल्याने मोठी अडचण निर्माण झाली. औरंगाबाद येथून कारागीर मागविण्यात आला. त्याने गेट उघडण्यासाठी प्रयत्न केला. मात्र तिथेही अडचण आल्याने अखेर ते काम अर्धवटच सोडण्यात आले. त्यामुळे पाटबंधारे विभागाचा निष्काळजीपणा आमच्या माथी येऊन पडला आहे. त्यामुळे आमचे नुकसान होऊ लागल्याची भावना शेतकरी शेषराव जाधव यांनी मांडली.
फोटो कॅप्शन : बनाेटी शिवारात पाण्याअभावी कोमेजलेले मका पीक