हिंगोली : वनपालाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुरूवारी दुपारी सापळा रचून दोघांना १० हजारांची खंडणी घेताना अटक केली. दोन्ही आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जामीन मंजूर झाला. औंढा येथील वनपाल संतोष रामकृष्ण दोडके यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विवेक सोनवणे यांच्या पथकाने शहरतील बिरसा मुंडा चौकात दोघांना १० हजार रूपये खंडणी घेताना पकडले. या प्रकरणात संतोष दोडके यांच्या फिर्यादीवरून आरोपी शिवाजी हरिभाऊ इंगोले (रा.पळसोना), सुनील दशरथ इंगोले (हिंगोली) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. शासकीय कामात क्षती होईल या हेतूने गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्या दोघांनी संतोष दोडके यांच्याकडे १५ हजारांची खंडणी मागितली होती. पंचासमक्ष १० हजाराची रक्कम घेताना त्यांना पकडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यात नोटांचे क्रमांकही अगोदरच टिपून घेतले होते. तपास फौजदार सोनवणे करीत आहेत. (प्रतिनिधी)
खंडणीप्रकरणी दोघांना जामीन
By admin | Updated: December 18, 2015 23:29 IST