उस्मानाबाद : रिक्षा चालविण्यासाठी पाच हजार रूपये लाचेची मागणी करीत २५०० रूपये जबरीने खिशातून काढणाऱ्या दोघास पोलिसांनी गजाआड केले़ ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास शहरातील बालाजी नगर परिसरात घडली असून, या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी सांगितले की, शहरातील पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या जवळ राहणारे गणेश मगर हे रिक्षा चालवितात़ शहरातील बालाजी नगर येथील रिक्षा पॉइंटवर मंगळवारी सकाळी किरण लगदिवे, विठ्ठल पिसे (दोघे रा़शेकापूर ता़उस्मानाबाद) यांनी संगणत करीत गणेश मगर यांना शिवीगाळ करून मारहाण केली़ तसेच रिक्षा चालविण्यासाठी पाच हजार रूपये खंडणीची मागणी करीत त्यांच्या खिशातील २५०० रूपये जबरीने काढून घेतले़ या प्रकरणी मगर यांच्या फिर्यादीवरून वरील दोघाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी रात्रीच्या सुमारास लगदिवे, पिसे या दोघांना गजाआड केली़ या प्रकरणाचा अधिक तपास पोनि रायकर हे करीत आहेत़ दरम्यान, शहर पोलिसांनी तातडीने दोघांना अटक केल्याने खंडणीखोरांचे धाबे दणाणले आहेत़ (प्रतिनिधी)
खंडणी मागणारे दोघे जण गजाआड
By admin | Updated: June 25, 2014 01:05 IST