औरंगाबाद : महानगरपालिकेचे बनावट भोगवटा प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा सिटीचौक पोलिसांनी रविवारी पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी मालमत्ताधारकांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दलालांच्या टोळीतील तीन जणांना अटक केली आहे. शेख रियाज (४०, रा. काळा दरवाजा परिसर), दशरथ आदमाने (५६,रा. रेणुकामातानगर, गारखेडा) आणि जयराम बुळे (४५,रा. विशालनगर, गारखेडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सेव्हन हिल येथील प्रवीण चौधरी यांनी महानगरपालिकेकडे भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केला होता. अधिकाऱ्यांनी त्या बाबत त्रुटी काढून अर्ज परत पाठविला होता. त्यामुळे चौधरी यांना शेख रियाज हा दलाल भेटला. त्याने चौधरी यांना ४० हजार रुपयांत महानगरपालिकेमधून भोगवटा प्रमाणपत्र काढून देतो, असे सांगितले. चौधरी यांनी रियाजला भोगवटा प्रमाणपत्र काढून देण्याचे काम दिले. त्यानंतर रियाज याने दशरथ आदमाने याच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रावर त्याने मनपा रेकॉर्ड रुममधील कर्मचारी जयराम बुळे यांंच्या मदतीने बनावट प्रमाणपत्रावर मनपा नगररचना विभागातील अधिकाऱ्यांचा बनावट शिक्का आणि सही करून घेतली आणि हे बनावट प्रमाणपत्र चौधरी यांना दिले.
बोगस भोगवटा; टोळी अटकेत
By admin | Updated: June 13, 2016 00:48 IST