सुनील घोडके, खुलताबादखुलताबाद शहरासह जवळपास २५ गावांसाठी जलसंजीवनी ठरलेल्या तालुक्यातील येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा संपल्याने संपादित क्षेत्रात शेतकऱ्यांकडून सर्रासपणे बोअर घेण्याचा सपाटा सुरू केला आहे़ विशेष म्हणजे बोअर घेण्याची परवानगी नाही़ मात्र, याची तमा न बाळगता पाटबंधारे विभागाच्या नाकावर टिच्चून हे शेतकरी प्रकल्पाची चाळणी करीत आहेत़तालुक्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर असताना प्रशासन मात्र पाण्याचा साठा सांभाळण्यात अपयशी ठरत आहे. गिरिजा मध्यम प्रकल्पातील संपादित क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांत परिसरातील शेतकऱ्यांनी कुठलीही परवानगी न घेता शेकडो विहिरी व बोअर खोदले आहेत. गिरिजा प्रकल्पातील पाणीसाठा संपला आहे़ त्यामुळे परिसरातील शेतकरी येथे बोअर मारून जमिनीच्या पोटातील पाण्याचा उपसा करीत आहेत. शनिवार (दि़२३) शासकीय सुटी असल्याचे पाहून गिरिजा प्रकल्पात दोन बोअर घेण्यात आले.विशेष म्हणजे प्रकल्प क्षेत्रात विहीर अथवा बोअर घेण्याची कुठलीही परवानगी नाही़ मात्र, तरीही पाटबंधारे विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पाणीटंचाईच्या काळात गिरिजात सर्रास बोअर घेण्यात येत आहेत. गिरिजा मध्यम प्रकल्पातून सध्या टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणारे टँकर भरण्यात येत आहेत. प्रकल्पातील अवैधरीत्या घेतलेल्या बोअरमुळे पाणीसाठी संपला. आता कुठून तालुक्याला पाणीपुरवठा होणार हा एक प्रश्नच आहे़ प्रशासन या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्यास तयार नाही़ कारवाई होत नसल्याने अनेकांनी या प्रकल्पात बोअर घेण्याचा सपाटा सुरू केला आहे़ त्यामुळे आगामी काळात तालुक्यावर जलसंकट निर्माण होणार हे निश्चित आहे़
गिरिजा प्रकल्पात बोअरचा धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 00:45 IST