पाथरी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पाथरी येथील उपविभागीय कार्यालयामध्ये कनिष्ठ अभियंत्याची पदे गेल्या चार महिन्यांपासून रिक्त आहेत. या उपविभागांतर्गत सहा ३३ के.व्ही. विद्युत उपकेंद्र कार्यान्वित असून कनिष्ठ अभियंत्याच्या रिक्त पदांमुळे या उपविभागाच्या सहाय्यक अभियंत्यावरच कामाचा बोजा मात्र वाढला आहे. तर लाईमनकडे कनिष्ठ अभियंत्याचा पदभारही देण्याची वेळ या उपविभागावर आली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर अशी अवस्था असल्याने आगामी काळात विजेची गंभीर समस्या निर्माण होणार असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे पाथरी येथे उपविभागीय कार्यालय आहे. या उपविभागांतर्गत सहा ३३ के.व्ही. उपकेंद्र येतात. यामध्ये बाभळगाव, पाथरी, वाघाळा, गुंज, हादगाव आणि कासापुरी या उपकेंद्रांचा समावेश आहे. तालुक्यामध्ये घरगुती आणि वाणिज्य ग्राहकांची संख्या १० हजार ५०० तर कृषीपंप ग्राहकांची संख्या ९ हजार ५०० आहे. म्हणजेच या तालुक्यात २० हजार ग्राहकांची संख्या आहे. उपविभागाला स्वतंत्र सहाय्यक अभियंता मिळाला खरा परंतु कार्यालयात कनिष्ठ अभियंत्यांची पदे रिक्त असल्याने वीज समस्येची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या उपविभागात पूर्वी चार कनिष्ठ अभियंत्यांची पदे मंजूर होती. त्यानंतर संबंधित विभागाने दोन कनिष्ठ अभियंत्याच्या पदाला कात्री लावून या उपविभागात ग्रामीण १ व ग्रामीण २ अशी पदे कार्यान्वित केली. कनिष्ठ अभियंता ग्रामीण १ कडे पाथरी शहर, ३३ के.व्ही. बाभळगाव, ३३ के.व्ही. वाघाळा, ३३ के.व्ही. गुंज, ३३ के.व्ही. पाथरी देण्यात आली तर ग्रामीण कनिष्ठ अभियंता २ कडे ३३ के.व्ही. हादगाव, ३३ के.व्ही. कासापुरी हे दोन भाग देण्यात आले. चार महिन्यांपूर्वी या भागात कार्यरत असणाऱ्या दोन्ही कनिष्ठ अभियंत्याची बदली विभागाच्या बाहेर झाली. त्यानंतर कनिष्ठ अभियंत्याची पदे मात्र भरण्यात आली नाही. पर्यायाने या उपविभागाचे सहाय्यक अभियंता दीपक तुरे यांच्याकडे कामाचा बोजा वाढला. दिवसभर कार्यालयात वीज समस्येसाठी शेकडो ग्राहक तक्रारी घेऊन येतात. कनिष्ठ अभियंता नसल्याने ग्राहकांच्या तक्रारीचा निपटारा वेळेच्या आत होणेही अवघड होऊन बसले आहे. या उपविभागातील सहा ३३ के.व्ही. उपकेंद्रांतर्गत विजेचा भारही मोठा वाढल्याने अनेकवेळा विजेमध्ये बिघाड होतो. पर्यायाने नागरिकांची ओरड होऊ लागली आहे. रिक्त पदे का भरण्यात आली नाहीत याचे गौडबंगाल मात्र ना ग्राहकांना ना संबंधित विभागाच्या अधिकारी कळाले नाही. या उपविभागातील विजेच्या समस्येमध्ये आगामी काळात वाढ होणार आहे.पावसाळा तोंडावर आहे, पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक वेळा विजेमध्ये बिघाड होतो, पर्यायाने रात्री-बेरात्री नागरिक वीज मंडळाकडे संपर्क साधतात परंतु कर्मचारीच नसल्याने वीज समस्या सुटण्याऐवजी वाढू लागली आहे. (वार्ताहर)दोन उपकेंद्राची आवश्यकतातालुक्यात सहा ३३ के.व्ही. उपकेंद्र आहेत. या उपकेंद्रांतर्गत विजेचा भार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. भारनियमनाव्यतिरिक्तही ट्रान्सफार्मर विजेच्या दाबामुळे अनेकवेळा बंद पडतात. यामुळे ढालेगाव आणि लिंबा येथे दोन नवीन ३३ के.व्ही. उपकेंद्र कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे.
अभियंत्याविना चालतो वीज मंडळाचा कारभार
By admin | Updated: June 21, 2014 00:49 IST