लातूर : शहरात भीषण पाणीटंचाई असून, नागरिकांना घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात जागो-जागी कचरा साठल्याने, मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, याचा निषेध म्हणून शहर जिल्हा भाजपच्या वतीने आमदार आणि महापौरांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस कचराभिषेक करण्यात आला.दिवसेंदिवस शहराचा पाणीप्रश्न अधिक बिकट होत असून, नळाव्दारे होणारा पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर टॅँकरच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठाही २० दिवसाआड होत आहे. पाणीपुवठ्याची जबाबदारी असणाऱ्या मनपातील सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या टंचाईला तोंड देत असतानाच शहरातील नागरिकांना कचऱ्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. वरवंटी येथील कचरा डेपोवर कचरा टाकण्यास मनाई केल्याने, कचऱ्याचे ढिग आहेत. त्यामुळे भाजपाने कचराभिषेक केला. आंदोलनात सुनिल मलवाड, शिवकुमार तोंडारे, अजित माने, अविनाश सोमवंशी, बालाजी शिंदे, मधुसुदन पारीख, भरत माने, विनोद शिंदे आदींचा समावेश होता.
आमदारांसह महापौरांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस भाजपचा कचराभिषेक
By admin | Updated: March 19, 2016 00:55 IST