औरंगाबाद : देशभरातील २२ राज्यांमध्ये ३९ मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रांमुळे उद्यापासून होणाऱ्या कोरोनाच्या प्रत्येक मृत्यूस भारतीय जनता पक्षच सर्वस्वी जबाबदार राहील, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते, माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी पत्रपरिषदेत केला.
ते म्हणाले, कोरोनाचे सगळे नियम पायदळी तुडवत जनआशीर्वाद यात्रांचा हा प्रकार हास्यास्पद नव्हे तर मूर्खपणाचा आहे. कोरोना अद्याप संपलेला नसताना या यात्रांमध्ये कुठेही सोशल डिस्टन्स पाळले जात नाहीत. शाळा बंद, मंदिरे बंद. रेल्वे आता कुठे चालू झाल्या. याचे त्यांना काहीच वाटत नाही. तुम्ही किती इनडिफरन्ट आहात. जनतेच्या भवितव्याशी त्यांना काही देणे-घेणे दिसत नाही. शेवटी माणसे जगली पाहिजेत, हा विचारच यांच्याकडे दिसत नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारने काही नियम केले आहेत. विद्यार्थ्यांना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दहावी, बारावीच्या परीक्षा घेतल्या नाहीत, याकडे लक्ष वेधून गायकवाड म्हणाले, देशात विक्रमी बेकारी आहे. दोन कोटी लोकांना नोकरी देऊ असे सांगत होते. उलट लोकांच्या नोकऱ्या गेल्या. कुटुंबच्या कुटुंबे उदध्वस्त झाली. राजकीय स्वार्थासाठी भाजपची मंडळी मिरवणुका काढत आहेत. मोठी गर्दी जमवताहेत, हे निषेधार्ह आहे. यांच्या जनआशीर्वाद यात्रा रोखण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. पण, गर्दी करणार नसल्याचे गायकवाड यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेससह सारेच राजकीय पक्ष कोरोनाचे नियम पाळत नाहीत. मग तेही जबाबदार नाहीत का, असे विचारले असता गायकवाड उत्तरले, पण सर्वस्वी जवाबदार भाजपच राहील. या पत्रपरिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शहराध्यक्ष विजय साळवे, सूरजितसिंग खुंगर, रवी माहोरकर आदींची उपस्थिती होती.