औरंगाबाद : भाजप स्थापनादिनीच भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम पक्षाने केल्यामुळे अनेक नाराज मंडळ अधिकाऱ्यांनी औरंगाबाद जिमखाना क्लब परिसरात खा. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत बंडखोरी करण्याचा इशारा दिला. भाजपच्या एकतर्फी निर्णयामुळे पक्षाच्या ४९ पैकी ५ जागाही निवडून येणे शक्य नाही. बहुतांश वॉर्डांत बंडखोरी होणार असून ती रोखता-रोखता पक्षाच्या नाकीनऊ येणार आहेत. शिवसेनेतदेखील तशीच अवस्था होणार आहे. सोडतीनुसार उमेदवारी देण्याचा ट्रेंड पक्षाने आणल्यामुळे विद्यमान नगरसेवकांच्या उमेदवाऱ्या पक्षाने कापल्या आहेत. त्यामुळे सेनेतही प्रचंड बंडखोरी होणार असून याचा लाभ दुसऱ्यांना होण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये आलेले सेनेचे माजी आ. किशनचंद तनवाणी यांचे मनपा निवडणुकीत प्रस्थ वाढत चालले होते. दरम्यान, पालकमंत्री रामदास कदम यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तनवाणी यांचे राजकीय करिअर होऊ देणार नसल्याचे ठामपणे सांगितले होते. भाजपचे खा. दानवे यांच्याशी सल्लामसलत करूनच वॉर्ड वाटपाचा निर्णय झाल्याची चर्चा सुरू आहे.
भाजपने कार्यकर्त्यांच्या पाठीत खुपसला खंजीर
By admin | Updated: April 7, 2015 01:30 IST