प्रभुदास पाटोळे/ छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २००८ च्या एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठा पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. घटनेच्यावेळी राज ठाकरे घटनास्थळी हजर नव्हते, त्यांनी बसवर दगडफेक केल्याचा व आंदोलनकर्त्यांना चिथावणी दिल्याचा कुठलाही पुरावा दोषारोपपत्रात नाही, असे न्यायालयाने म्हटले.
कुठलाही पुरावा नसल्यामुळे राज ठाकरेंविरुद्ध फौजदारी खटला चालविणे म्हणजे कायदेशीर प्रक्रीयेचा गैरवापर ठरेल, असे निरीक्षण नोंदवीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी राज ठाकरे यांच्याविरुद्ध ‘सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत’ दाखल गुन्हा आणि दोषारोपपत्र रद्द करुन त्यांची निर्दोष सुटका केली.
काय आहे प्रकरण?
२००८ साली राज ठाकरे यांच्या अटकेनंतर उसळलेल्या दंगलीत परळी- गंगाखेड मार्गावर एस टी बस थांबवून दगडफेक केल्याबाबत राज ठाकरेंसह मनसे कार्यकर्त्यांविरोधात सार्वजनिक मालमत्तेस नुकसान पोचवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी राज ठाकरेंनी परळीच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या सुनावणीअंती खंडपीठाने दि.२१ मार्च रोजी वरीलप्रमाणे आदेश दिला आहे.