जालना: शहरासह जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध समाजसेवी संघटनांनी सामाजिक उपक्रम राबवून महामानवास अभिवादन केले. जयभीमच्या जयघोषाने अवघा आसमंत दुमदुमून गेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ जयंतीनिमित्त शहरात शुक्रवारी सकाळपासूनच अपूर्व उत्साह दिसून आला. विविध रस्ते, चौक तसेच वसाहतींमध्ये जयंतीचे कार्यक्रम पार पडले. सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, विविध शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बुद्ध विहारमध्येही जयंतीनिमित्त वंदनेसह विविध कार्यक्रम घेण्यात आले. अनेक घरांवर निळेध्वज फडकत होते. सायंकाळनंतर जयंतीचा खरा उत्साह दिसून आला. सजविलेल्या अनेक वाहनांमधून बाबासाहेबांची प्रतिमा शोभून दिसत होती. अनेक संघटना तसेच मंडळांनी सजीव देखावे सादर करून जनजागृती केली. वाहनांवर आकर्षक विद्युत रोषणाई करून बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले होते. नूतन वसाहत, रेल्वेस्थानक, कन्हैयानगर आदी भागांतील मिरवणुका लक्षवेधी होत्या. डीजेवर बाबासाहेबांच्या उद्देशून असलेल्या गीतांवर तरूणांसोबतच आबालवृद्धांनी ठेका धरल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले. डीजेसोबतच काही जयंती समितीचे ढोलपथक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. सुभाष चौकात भीम जल्लोष स्वागत मंचने उभारलेले एलईडी स्क्रीन, लाईव्ह गीते आणि आकर्षक असे शार्पी लाईटसमुळे एक वेगळाच माहोल तयार झाला होता. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता पाटील, आयोजक संदीप खरात, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, बबलू चौधरी, नगरसेविका मीनाक्षी खरात, विजय चौधरी, अरूण मगरे, रितेश चौधरी, जीवन सले, अंकुश पाचफुले आदी उपस्थित होते. दरम्यान मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
भीमसागर उसळला!
By admin | Updated: April 15, 2017 00:33 IST