उन्मेष पाटील कळंबकडाक्याच्या थंडीत उबदार कपड्यांची सगळ्यांनाच आवश्यकता भासते. त्यानुसार हिवाळा सुरु होण्याअगोदरच अनेकजण या कपड्यांची खरेदी करतात. मात्र रस्त्यावर राहून दोन वेळच्या भाकरीचा शोध घेणाऱ्या अनेकांच्या नशीबी हे उबदार कपडे येत नाहीत. त्यामुळे कडाक्याच्या थंडीतच त्यांना लेकरा-बाळांसह रात्र काढावी लागते. अशा गरीब, कष्टकऱ्यांना थंडीपासून स्वताचा बचाव करता यावा म्हणून येथील तरुणांतर्फे ‘मायेची चादर’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून मागील वर्षी तब्बल ७०० गरजूंपर्यंत चादरी, शाल, गोधडी हे साहित्य पोहंचविण्यात आल्या. सध्या घरोघरी दसऱ्याची साफसफाई सुरु आहे. त्यामुळे या उपक्रमासाठी आवश्यकता नसलेले कपडे नागरिकांकडून गोळा करण्याचे काम ही तरुणाई करीत आहे.‘गारवा खूप आहे, अंग चोरून किती घेऊ?’आपल्याच सारख्या हाडामासांना मायेची उब देऊ’असा ठाम निश्चय करून कळंब शहरातील १५ ते २० युवकांनी मागील वर्षी घरोघरी जाऊन जुन्या, वापराअभावी पडून असणाऱ्या चादरी, शाल, गोधडी गोळा केल्या. मित्र परिवार, नातेवाईक त्यांच्या संदर्भातून मिळणारे काही दानशूर अशांना संपर्क करून थेट त्यांच्या घरी जाऊन युवकांनी हे साहित्य गोळा केले. मागील वर्षी थंडीने अत्युच्य पातळी गाठली होती. या थंडीत घरी शेकोटी घेत किंवा रूम हिटरची ऊब न घेता या तरुणांनी शहराशेजारील भटक्या लोकांची पालं गाठली. या ठिकाणी दोन घासासाठी झगडणाऱ्या अनेकांकडे थंडीपासून बचावासाठी अंगावरील वस्त्रांशिवाय काहीही नव्हते. त्यामध्ये लहान मुले, वृध्दांची अवस्था तर अतिशय बिकट होती. हे चित्र पाहून अस्वस्थ झालेल्या या युवकांनी गोळा केलेले साहित्य या उघड्या कुटुंबांना देऊन त्यांना मायेची ऊब दिली. एवढ्यावरच न थांबता या तरुणांनी ग्रामीण भागात सुरू असलेल्या चारा छावणीवरील शेतकऱ्यांनाही हे साहित्य पुरविले.सध्या घराघरात दसऱ्यासाठी साफसफाई सुरू आहे. या सफाईमध्ये भंगारात निघणाऱ्या चादरी, शाली, गोधडे तसेच इतर कपडे टाकून न देता ते आम्हाला द्यावीत असे आवाहनच या युवकांनी विविध माध्यमांद्वारे केले आहे. यंदा जवळपास गरजू पाच हजार लोकांपर्यंत हे साहित्य पोहोचविण्याचा या युवकांनी संकल्प केला आहे. गतवर्षी राबविलेल्या या उपक्रमानंतर अनेकांनी यंदा स्वत:हून स्वेटर, मफलर, शाल, चादरी स्वताहून या तरुणांकडे आणून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याउपरही काही मंडळीनी अशा कुटुंबियांसाठी काम करण्याची तयारी दर्शविली आहे. हा उपक्रम राबवित असताना भटक्या तसेच कष्टकरी समाजाचे प्रश्न त्यांच्या समस्या आम्हाला समजल्या. यापुढील काळात सर्व समाजाच्या सहकार्याने त्यांच्यासाठी इतरही उपक्रम राबविण्याचा विचार आता ही तरुणाई करु लागली आहे.‘मायेची चादर’ हा उपक्रम गतवर्षी शहर व परिसरापुरता मर्यादित होता. यंदा हा उपक्रम राबविण्यासाठी इतर जिल्ह्यातूनही काही संस्था, युवक मंडळे संपर्कात आहेत. धिम्म्या गतीने हा उपक्रम चळवळीचे स्वरूप घेते आहे. या सगळ्यात समाजाच्या शेवटच्या घटकासाठी काहीतरी काम केल्याचे समाधान या युवकांच्या चेहऱ्यावर आहे. या उपक्रमात शहरातील बाळासाहेब कथले, सुमित बलदोटा, नितीन हारकर, पृथ्वीराज देशमुख, यश सुराणा अग्रभागी आहेत. तरुणपिढी सध्या मोबाईलवेडी व टेक्नोसॅव्ही झाली असताना कळंबच्या या युवकांनी समाजसेवेचं व्रत हाती घेतलं आहे. दररोजच्या नोकरी-व्यवसायातून थोडा वेळ काढून ही मंडळी समाजासाठी उपक्रम राबवित आहे ही बाब कौतुकाची असल्याच्या प्रतिक्रिया शहरवासियांतून व्यक्त होत आहेत.
रस्त्यावरील निराधारांना ‘मायेची चादर’
By admin | Updated: October 18, 2016 00:15 IST