बीड : उन्हाळा सुरु होण्यास अद्याप १५ दिवसांचा कालावधी आहे. मात्र, त्यापुर्वीच पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून बुधवारी सायंकाळी कमाल तापमान ३७ अंश नोंदविले गेले. यामुळे येणाऱ्या उन्हाळ्याची तीव्रता किती असेल याचा अंदाज नागरीक बांधत आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून कडक ऊन पडत असल्यामुळे नागरीक टोप्या व गमजे सोबत घेऊन घराबाहेर पडत आहे. बाराच्या सुमारास ऊन आणखी वाढते त्यामुळे नागरिकांना उन्हाची तीव्रता जाणवू लागते. या संदर्भात बोलताना नागरीक महेश धांडे म्हणाले की, दुपारी बारा ते तीन वाजण्याच्या दरम्यान उन्हाचे अक्षरक्ष: चटके बसतात. त्यामुळे टोपी व चष्मा घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही.दरम्यान उन्हाळा सुरु होण्यास अद्याप पंधरा दिवसांचा कालावधी असला तरी आताच उन्हाळा सुरु झाला असल्याचा भास निर्माण झाला आहे. रसवंती, ज्युसबार झाले सुरुउन्हाची तीव्रता अधिक होत असल्यामुळे नागरीक थंड पेयाला प्राधान्य देत आहेत. उन्हाळा सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर रसवंती व ज्युसबार सुरु झाले आहेत. तेथे अनपेक्षीतरित्या येणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. या संदर्भात बोलताना रसवंती चालक विजय परांजपे म्हणाले, ऊन वाढत चालले असल्याने दुकानात येणााऱ्यांची संख्या गत वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक आहे. दरम्यान बीड शहरातील मुख्य बाजारपेठामध्ये कूलर, पंखे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. तसेच टोप्या, गमजे यांची मागणी वाढली आहे. (प्रतिनिधी)
बीडचा पारा ३७ अंशावर
By admin | Updated: February 19, 2015 00:45 IST