कळंब : तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गासह राज्य मार्गावर बसथांब्यांची मोठी संख्या असताना प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे मात्र बोटावर मोजण्याइतपतच उपलब्ध आहेत. त्यांचीही एकतर दुरवस्था होऊन मोडकळीस आले आहेत किंवा त्यावर अतिक्रमण झाले आहे.तालुक्यातील कळंब-येरमाळा राज्य मार्गावर हासेगाव, आंदोरा, कन्हेरवाडी, मनुष्यबळ पाटी, दहिफळ पाटी, परतापूर, उमरा, पानगाव तर कळंब-ढोकी राज्य मार्गावर डिकसळ, माळकरंजा, गोविंदपूर, भाटशिरपुरा ही गावे तसेच मंगरूळ, जवळा, एकुरगा, बोरवंटी व देवळाली या गावांच्या पाट्या आहेत. लातूर-कळंब-डोंगरेवाडी या राज्य मार्गावरही रांजणी, ताडगाव, आवाड शिरपुरा, कोथळा, खडकी, लोहटा (पूर्व व पश्चिम), करंजकल्ला, भाटसांगवी, खोंदला, आथर्डी, बहुला, आढळा, भोगजी, चौफुला आदी बसथांबे आहेत. याशिवाय तांदूळवाडी, बोर्डा, मोहा, सातेफळ, शेलगाव, वडगाव ही गावे कळंब-येडशी राज्य मार्गावर येतात. प्रमुख जिल्हा मार्गावरही ईटकूर, हावरगाव, वाकडी, गंभीरवाडी, दहिफळ आदी प्रमुख गावे असून ही गावे लगतच्या मोठ्या गावास अथवा तालुका किंवा जिल्हा ठिकाणाला जोडली आहेत. तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे पसरलेले असताना आंदोरा-मस्सा (खं), कन्हेरवाडी पाटी, ईटकूर, गोविंदपूर, रांजणी, मोहा आदी बोटावर मोजण्याइतपत गावातच प्रवासी निवाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. तर शिराढोण व येरमाळा येथे मिनी बसस्थानक आहे. बसथांब्यावर प्रवासी निवारा नसल्याने उन्हाळा व पावसाळ्यात प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषत: हावरगाव, वाकडी, कोठाळवाडी, मंगरूळ पाटी, देवळाली पाटी, शिंगोली, ताडगाव, आवाड शिरपुरा, मंगरूळ पाटी, जवळा पाटी, शेलगाव (दि), चोराखळी, वडगाव (ज) येथील प्रवाशांना प्रवासी निवारा नसल्याने अधिक त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)यापूर्वी आमदार, खासदार हे लोकप्रतिनिधी स्थानिक विकास निधीतून प्रवासी निवाऱ्यासाठी निधी उपलब्ध करून देत होते. राज्य परिवहन महामंडळही निधीचे कारण सांगून व त्यांच्या स्थापत्य विभागावर जबाबदारी ढकलून मोकळे होत होते. सद्यस्थितीत या दोघांचेही दुर्लक्ष झाल्याने नवीन निवारे तर सोडाच, परंतु आहे त्या निवाऱ्यांचीही देखभाल होत नसल्याचे दिसत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनीच पुढाकार घेण्याची गरजही जाणकारांतून व्यक्त होत आहे.
बसथांबे मुबलक; निवाऱ्यांची वानवा
By admin | Updated: July 14, 2014 01:01 IST