उस्मानाबाद : परतीच्या पावसामुळे बेंबळी गावाला पाणीपुरवठा करणारा रूईभर प्रकल्प तुडूंब भरला आहे़ प्रकल्प भरून महिन्याचा कालावधी लोटला तरी ग्रामपंचायत प्रशासन सुरळीत पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला़उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी गावात मागील वर्षानुवर्षापासून पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर आहे़ रूईभर येथील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर पाणीप्रश्न काही अंशी मार्गी लागला होता़ मात्र, मागील तीन-चार वर्षापासून पावसाने ओढ दिल्याने रूईभर येथील साठवण तलाव कोरडाठाक पडला होता़ परिणामी गावाला सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला़ परतीच्या पावसामुळे कोरडाठाक पडलेला रूईभर प्रकल्प तुडूंब भरला़ मात्र, पाणीपुरवठा योजनेचे साहित्य चोरीस गेल्याने मागील महिनाभरापासून गावातील पाणीपुरवठा बंदच होता़ तलाव भरलेला असतानाही गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती़ तर अनेकांना विकत पाणी घेवून तहान भागवावी लागत होती़ ही बाब पाहता काही ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी पाणीपुरवठा तत्काळ सुरू करा अन्यथा ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता़ दिलेल्या मुदतीत गावातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने शुक्रवारी गावातील हनुमान चौकातून ग्रामपंचायतीवर घागरमोर्चा काढण्यात आला़ मोर्चेकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरून त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करण्यासह इतर मागण्या लावून धरल्या़ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर मोर्चेकरी परतले़ या मोर्चात माजी उपसरपंच बाळासाहेब माने, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाटील, संतोष आगलावे, नवाब पठाण, पांडुरंग पाटील, चेअरमन सोमनाथ गवळी, पांडुरंग पवार, नवनाथ कांबळे, कमलाकर दाणे, तुकाराम राऊत, शहाजान मुजावर, सतिश सोनटक्के, सलीम शेख यांच्यासह ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)
पाण्यासाठी बेंबळीकरांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा
By admin | Updated: October 22, 2016 00:32 IST