बदनापूर : येथील आठवडी बाजार मार्केट कमिटी परिसरातून गावात स्थलांतर करावा व हा बाजार जैसे थे ठेवावा, असे दोन वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाल्यामुळे शुक्रवारी बदनापुरात तणाव निर्माण झाला होता. बदनापूर येथील आठवडी बाजार हा पूर्वी गावात व महामार्गावर भरवला जात होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून न्यायालयाच्या आदेशाने हा बाजार येथील मार्केट कमिटी परिसरात भरविण्यास सुरूवात केली. परंतु येथील नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व काही नगरसेवकांनी दोन दिवसांपुर्वी हा बाजार पुन्हा गावात भरविण्याबाबत ठराव २३ डिसेंबर २०१५ रोजीच्या सर्वसाधारण सभेत घेतल्याचे पत्र बदनापूर पोलिसांना देवून संरक्षणाचंी मागणी केली. त्यानंतर बचाव समितीचे अध्यक्ष पंकज जऱ्हाड यांनी हा बाजार गावात नेवू नये, जर हा बाजार पुन्हा स्थलांतरित केला तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. तसेच छावाचे तालुका अध्यक्ष संजय जऱ्हाड यांनी हा बाजार मार्केट कमिटीच्या ठिकाणीच भरवावा नसता, छावाच्या वतीने तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला होता. त्यामुळे पुन्हा आठवडी बाजार भरविण्याबाबत संघर्ष सुरू झाला असल्याचे चित्र बदनापुरात दिसले. परिस्थितीचा विचार करून पोलिसांकडून शुक्रवारी बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान, या वादामुळे भाजीपाला विक्रेत्यांची फरफट झाली. (वार्ताहर)
बदनापूर आठवडी बाजाराचा वाद पुन्हा पेटला...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 00:49 IST