संताेष हिरेमठ
औरंगाबाद : वाहनांच्या नंबरप्लेटवर भाऊ, दादा, नाना अशी नावे लिहिली तर कारवाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा नंबरप्लेटचे प्रमाण कमी झाले. कोरोनामुळे अर्थचक्र बिघडले; पण या कोरोना काळातही फॅन्सी नंबर घेण्याकडे वाहनधारकांचा ओढा कायम आहे. कोणी श्रद्धेपाटी, तर कोणी हौसेपोटी लाखो रुपये पसंतीच्या नंबरसाठी मोजत आहेत. गेल्या सहा महिन्यांत ९९९९, ००७७, ०००७ आणि ०००९ या क्रमांकासाठी सर्वाधिक दीड लाख रुपये मोजण्यात आले. आरटीओ कार्यालयातून फॅन्सी नंबर घेण्यासाठी नेहमीच प्रचंड चढाओढ असते. एकाच नंबरसाठी अनेकदा जास्त अर्ज येतात. अशावेळी नंबरचा लिलाव केला जातो. लाखो रुपये मोजून नंबर घेतला जात आहे. कोरोना काळात अनेकांचे अर्थचक्र बदलले. बचतीवर नागरिकांकडून भर दिला जात आहे. परंतु चाॅईस नंबर घेण्याचा कल कुठेही कमी झालेला नाही. वाहनांच्या आकर्षक नंबरसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ झाली. मात्र, पसंती नंबरसाठी खिशाला कात्री बसली तरी चालेल, अशी भूमिका काही वाहनचालकांची पाहायला मिळत आहे.
-----
या तीन नंबर्सना सर्वाधिक मागणी
-११११- ७० हजार रुपये
-४४४४- ७० हजार रुपये
-७००७ -५० हजार रुपये
------
या नंबरचा रेट सर्वांत जास्त
-९९९९- १ लाख ५० हजार
-००७७ - १ लाख ५० हजार
-०००७- १ लाख ५० हजार
----
आरटीओ कार्यालयाची कामाई
२०१९- २ कोटी ९२ लाख ८९ हजार
२०२०- २ कोटी १३ लाख १ हजार
२०२१ मे - १ कोटी १८ लाख २९ हजार
-----
कोरोना काळातही हौसेला मोल नाही
-हौसेला कुठलेही मोल नसते, असे म्हटले जाते. वाहनांसाठी घेण्यात येणाऱ्या चॉइस, फॅन्सी नंबरच्या बाबतीत हीच स्थिती आहे. नवीन वाहन घेताना विशेष, आवडीचा नंबर घेण्याचा ओढा कोरोना काळातही कायम आहे.
- गतवर्षी, २०२० मध्ये चाॅईस नंबरच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयाला तब्बल दोन कोटींचा महसूल मिळाला आहे.
- गेल्या पाच महिन्यांत म्हणजे जानेवारी ते मे २०२१ यादरम्यान एक कोटींचा महसूल आरटीओ कार्यालयाच्या तिजोरीत जमा झाला.
---
...तर नंबरसाठी होतो लिलाव
१. आरटीओ कार्यालयाकडून नवीन नंबरची मालिका सुरू केल्यानंतर चाॅईस नंबरसाठी अर्ज मागविण्यात येतात.
२. एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लिलाव पद्धतीने नंबरचे वाटप केले जाते.
३. यासाठी बंद लिफाफ्यात मूळ शुल्काव्यतिरिक्त अधिक रकमेचा धनाकर्ष जमा करावा लागतो. ज्याची रक्कम अधिक, त्यास तो नंबर दिला जातो.
----
कोरोनामुळे काहीसा परिणाम
कोरोनामुळे वाहन नोंदणीचे काम काही काळ बंद होते. त्यामुळे चाॅईस नंबर घेण्यावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. एकापेक्षा जास्त अर्ज आले तर लिलाव पद्धतीने चाॅईस नंबरचे वाटप केले जाते. सध्या आरटीओ कार्यालय आणि डिलर्स यांच्यात बदलाचा कालावधी आहे.
- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी