औरंगाबाद : वन विभागाने औरंगाबाद, जालना येथील ४० पैकी २० सर्पमित्रांचे परवाने रद्द करून सर्पमित्रांना चाप बसविला आहे. नावनोंदणी, नूतनीकरण नाही, वार्षिक कामगिरीचा काहीही रिपोर्ट नसल्याने नियमांवर बोट ठेवून वन विभागाने कारवाई केली आहे.साप दिसला की, वन विभाग किंवा मित्रांना किंवा फायर ब्रिगेडलादेखील कॉल केले जातात. तुम्ही ज्या क्षेत्रात राहता त्या क्षेत्रात सर्पमित्र तात्काळ उपलब्ध होत नाही. सर्प मानवाचा शत्रू नसून तो मित्र आहे, ही शिकवण आठवते. सापाला मारून त्याच्या प्रजाती नष्ट करणे योग्य नाही, असे सांगून सर्पमित्रांची वाट पाहिली जाते. सर्प अन्न शोधार्थ एखाद्या घरात शिरलेला असतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यास सर्पमित्रांकरवी धरून सुरक्षित वन विभागात सोडण्यात यावे, हीच खरी प्रक्रिया आहे.सर्पमित्रांची संख्या वन विभागाकडे जवळपास ४० नोंदलेली होती. यातील १४ सर्पमित्रांनी उपवनसंरक्षकांकडे नूतनीकरण केले. इतरांना वन विभागाने नोटिसा पाठवून विचारणा केली. परंतु त्यावर काहीही उत्तर आले नाही. फक्त ४ जणांनी उत्तरे दिली अन् नूतनीकरण केले. यंदा २ नवीन परवाने देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी आपल्या परवान्याचे नूतनीकरण करावे हे सक्तीचे आहे. मात्र, त्याकडे चुकूनही लक्ष दिले जात नाही. त्यामुळे कारवाई करण्यात आली असल्याचे उपवनसंरक्षक अशोक गिऱ्हेपुंजे म्हणाले.
वन विभागाचा सर्पमित्रांना अखेर चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2016 01:05 IST