कन्नड : तालुक्यात वाटप करण्यात आलेल्या गारपीट अनुदानात झालेले घोळ उघडकीस येऊ लागले आहेत. तालुक्यातील बरकतपूर येथे अनुदान वाटप करताना शेतकऱ्यांकडे असलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राची नुकसानभरपाई देणे, गटात जमीनच नसलेल्या शेतकऱ्याच्या नावे अनुदान देणे, असे प्रकार घडले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून तलाठ्यास कार्यमुक्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.बरकतपूर-रायगाव ही गावे वाकद सजेअंतर्गत येत असून, या दोन्ही गावांत एकूण ९०० शेतकरी असून, यातील फक्त ३७१ शेतकऱ्यांना गारपीट अनुदान मिळाले. उर्वरित ५५० शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. वाकद सजेचे तलाठी बी. के. चौधरी यांनी शेतावर जाऊन पंचनामे न करता कार्यालयातच बसून केले, तसेच पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी करण्यात आली. ज्यांनी पैसे दिले, त्यांच्या नावावर क्षेत्र नसतानाही पंचनामे करून त्यांना अनुदान मिळवून दिले.बरकतपूर येथील गट क्र. ७१ हा विठ्ठल देशमुख, विश्वास देशमुख व संजय सोन्ने यांच्या नावावर आहे; मात्र याच गट नंबरवर अण्णा कौतिक यांचे १ हे. ८१ आर क्षेत्र कांदा पिकाचे दाखविण्यात आले. त्यांना १२ हजार रुपये अनुदान मिळाले. गट नं. ३५५ मध्ये फकिरा भागाजी यांचे ०.०२ आर क्षेत्र असून, त्यांचे ०.३० आर गव्हाचे नुकसान दाखविण्यात आले. त्यांना ३ हजार रुपये नुकसान भरपाई मिळवून दिली, असे आरोप निवेदनात करण्यात आले आहेत. या तलाठ्याची चौकशी करून त्यास कार्यमुक्त करावे, वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळवून द्यावे; अन्यथा १८ जुलैपासून तहसीलसमोर उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
अजब तलाठ्याची गजब कहाणी
By admin | Updated: July 10, 2014 01:15 IST