औरंगाबाद : शनिवारी जिल्हा परिषद मैदानावर लागलेल्या भयावह आगीत १४० फटाक्यांची दुकाने जळून राख झाली. त्या आगीच्या केंद्रबिंदूचा शोध घेण्यासाठी पोलीस, महावितरण, फॉरेन्सिक विभागाची पथके आपापल्या पद्धतीने कामाला लागले असून, महावितरणशी निगडित असलेले सर्व पुरावे विद्युत निरीक्षक ए.एच.मुजावर यांनी ताब्यात घेत ते सील करून येथील महावितरण कंपनीच्या लॅबमध्ये जमा केले आहेत. मंगळवार दिवसभर जि.प.मैदानावर आगीनंतर साचलेला मलबा हटविण्याचे काम सुरू होते. मुंबईतून आलेल्या सर्व अधिकाऱ्यांची पथके रवाना झाली असून, आता वेगवेगळ्या पथकांकडून काही अहवाल येतो, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्टॉल क्रमांक ४४ पासून आग लागल्यामुळे त्या स्टॉल मालकापासून सर्वांचे जबाब घेण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी सांगितले, विद्युत मीटर परीक्षण प्रयोगशाळेत दिले आहे. मीटर टेस्ट करण्यासाठी एक विशिष्ट कीट असते. दिवाळीच्या सुट्यांमुळे पुरावे जमा करून ते देण्यात आले आहेत. बुधवारपासून त्यावर काम सुरू होईल. महावितरणने जि.प.मैदानावर देऊ केलेले विद्युत मीटर चांगल्या स्थितीत आढळून आले आहे. मीटरचे किटकॅट, कंडक्टर जळालेले नाही; परंतु एवढी मोठी घटना घडली आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेच, अनेक कुटुंबियांच्या दिवाळी सणाच्या आनंदावर विरजन पडले. त्यामुळे त्या आगीचे मूळ कारण समोर येणे गरजेचे आहे.
महावितरणचे सर्व पुरावे लॅबमध्ये
By admin | Updated: November 2, 2016 00:49 IST