अगरतळा : भारताचे सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) व बांगलादेश सीमा गार्ड (बीजीबी) यांच्यात शुक्रवारी चर्चेत सीमेवरील गुन्हेगारी रोखण्यासाठी व शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपाययोजना करण्यावर सहमती झाली. बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
बीएसएफ त्रिपुरा फ्रंटियरचे महानिरीक्षक सुशांतकुमार नाथ यांनी सांगितले की, महानिरीक्षक स्तरावरील दोन दिवसीय सीमा समन्वय संमेलनात भारत-बांगलादेश सीमेला लागून असलेल्या अनेक स्थानांवर कुंपण घालण्यासारख्या अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. शुक्रवारी अगरतळा येथील बीएसएफच्या विभागीय मुख्यालयात ही चर्चा संपली.
नाथ यांनी सांगितले की, दोन्ही देशांत आधीच मजबूत असलेले संबंध आणखी दृढ करण्याच्या उद्देशाने अनुकूल वातावरण बनविण्यासह सीमासंबंधी विचारांचे आदानप्रदान करण्यात आले. आम्ही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. त्यात सीमेवरील सर्व प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी कारवाई करण्यावर सहमती झाली.
दरम्यान, बीजीबीचे अतिरिक्त महासंचालक फरीद हसन यांनी सांगितले की, दोन्ही बाजूंनी अंमली पदार्थांची तस्करी, स्फोटके व मानवी तस्करीसारखे गुन्हे कोणत्याही स्थितीत खपवून न घेण्यावर सहमती झाली.