जालना : थकीत देयकांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणची नवप्रकाश योजना १ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. या योजनेत आता कृषीपंपधारकांना व न्यायप्रविष्ठ प्रकरणात हुुकुमनामा (डिक्री) मंजूर झालेल्या विशिष्ट प्रकरणांचाही समावेश करण्यात आला आहे.महावितरणच्या नवप्रकाश योजनेत लोक अदालत किंवा न्यायप्रविष्ट असलेल्या थकबाकीच्या प्रकरणातील थकबाकीदारांना सहभागी होता येणार आहे. याशिवाय न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकुमनामा मंजूर होऊन १२ वर्षे झाली असल्यास अशा ग्राहकांनाही या योजनेत सहभागी होता येणार आहे.नवप्रकाश योजनेत सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजना वगळता उर्वरित सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांचा समावेश आहे. यात थकबाकीची मूळ रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेस यामध्ये विद्युत जोडणी घेताना सुट देण्यात आली आहे. ग्राहकांना कोणत्याही प्रतिज्ञापत्राची गरज लागणार नाही. शिवाय वीज जोडणीचा अर्ज ग्राहकांना कार्यालयात मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.नवप्रकाश योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा असून या योजनेत जानेवारी २०१७ अखेरपर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची रक्कम १०० टक्के माफ होणार आहे. तर योजनेच्या फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यात मूळ थकबाकी आणि २५ टक्के व्याजाच्या रक्कम भरणा केल्यास ७५ टक्के व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ होणार आहे. (प्रतिनिधी)
कृषीपंप ग्राहकांनाही मिळणार नवप्रकाश योजनेचा लाभ
By admin | Updated: January 6, 2017 00:30 IST