ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि. ११ : अवैध वाळू वाहतुक करणा-या ट्रक आणि ट्रॅक्टरवर चिकलठाणा पोलिसांनी गुरूवारी रात्री सापळा रचून शेंद्रा-भालगाव रस्त्यावर पकडले. या ट्रकमध्ये विना रॉयल्टीची पाच ब्रॉस आणि ट्रॅक्टरमध्ये एक ते दिड ब्रास वाळू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूपट्टे बंद असताना वाळू माफिया विविध ठिकाणच्या नद्यामध्ये अवैध वाळू उत्खनन करीत आहेत. उत्खनन केलेली वाळू थेट औरंगाबादेत ट्रक, हायवा आणि ट्रॅक्टरमधून पाठविण्यात येते. गुरूवारी रात्री पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर अधीक्षक उज्वला वनकर, उपविभागीय अधिकारी अशोक आमले यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले आणि कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना काही हायवाचालक मुख्य रस्त्याऐवजी अन्य मार्गाचा वापर करून वाळूची चोरटी वाहतुक करीत असल्याचे समजले. यामुळे पोलिसांनी भालगाव ते शेंद्रा या मार्गावर त्यांचे वाहन उभे केले असता वाळू भरून जाणारा हायवा ट्रक आणि ट्रॅक्टर त्यांनी पकडला.
या वेळी पोलिसांनी वाहनचालक नवनाथ देवीदास कानोले (रा. वाहेगाव) आणि गणेश किसन कुबेर (रा. भालगाव) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी जालना जिल्ह्यातून ही वाळू आणल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपींकडे वाळूच्या रॉयल्टीच्या पावत्या मात्र पोलिसांना आढळल्या नाही. यावरुन ही वाळू बेकायदेशीर असल्याचे समजल्याने ही ट्रक जप्त करून याविषयीचा अहवाल महसूल विभागाकडे पाठविण्यात आला,अशी माहिती ताईतवाले यांनी दिली.