हिंगोली : वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे शेतातून जाण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यात एका दुचाकीची मोडतोड करण्यात आली असून, परस्पर विरोधी तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सुरेश गोपीनाथ दळवी (वय ४०) यांच्या फिर्यादीवरून आरोपी जावेद इस्माईल कुरेशी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शेतातून जाण्याच्या वादातून त्या दोघात बाचाबाची झाली. जावेद कुरेशी याने दगडाने दळवी यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच चाँदपाशा इस्माईल कुरेशी यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुरेश गोपीनाथ दळवी, गणेश गोपीनाथ दळवी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. कुरेशी यांना रस्त्यात अडवून मारहाण करीत दुचाकीची मोडतोड करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत त्यांनी नमूद केले आहे. घटनास्थळी वसमतचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, पोनि नानासाहेब नागदरे यांनी भेट दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक यशवंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार भगवान वडकिल्ले, प्रकाश आवळे, प्रेमदास चव्हाण, गणेश पवार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. (प्रतिनिधी)
कुरूंदा येथे २ गटांत हाणामारी
By admin | Updated: September 27, 2014 00:55 IST