वडवणी: तालुक्यातील चिंचवडगाव येथील दत्तात्रय पांडुरंग घोलप यांचे २७ मे रोजी अपहरण करण्यात आले होते. तब्बल १५ दिवस उलटूनही हे आरोपी अद्याप मोकाट आहेत. या आरोपींना अटक करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना मंगळवारी देण्यात आले आहे.वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव येथील रहिवासी असलेले दत्तात्रय पांडुरंग घोलप हे २७ मे रोजी रात्रीच्या सुमारास वडवणीहून चिंचवडगावला जात होते. घराकडे परतत असताना गावातील आठ ते दहा जणांनी घोलप यांचे अपहरण करुन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. घोलप यांचे अपहरण झाल्यानंतर कुटुंबीय व नातेवाईकांनी त्यांंचा सर्वत्र शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. दोन दिवसांनंतर घोलप हे आष्टी तालुक्यातील चुंबळी फाट्यावरील पुलाखाली गंभीर अवस्थेत तेथील नागरिकांना दिसून आले. तेथील नागरिकांनी घोलप यांची मदत करीत पोलिसांशी संपर्क केला. घोलप सापडले त्यावेळेस ते बेशुद्धावस्थेत होते. त्यानंतर २९ मे रोजी वडवणी पोलिसांत घोलप यांचे अपहरण केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.अपहरण करणारे सत्यप्रेम घुगे, ज्ञानोबा घुगे, वचिष्ठ घुगे, शांतीलाल घुगे, महेश घुगे, धर्मराज घुगे, सूर्यकिरण घुगे यांच्यासह चार जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे सांगितले जात आहे. हे अपहरणकर्ते तब्बल पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही मोकाट असल्याने वडवणी पोलिसांबाबत संशय व्यक्त केला जात आहे. हे आरोपी शहरात मोकाट फिरत आहेत. या आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी आश्रुबा घोलप, आसाराम घोलप यांनी केली आहे. वडवणीचे सपोनि संतोष साबळे म्हणाले, आरोपींना लवकरच अटक करू, आम्ही त्यांच्या शोधात आहोत. (वार्ताहर)
घोलप यांचे अपहरण करणारे आरोपी अद्याप मोकाटच !
By admin | Updated: June 12, 2014 01:36 IST