औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या पाच स्वीकृत सदस्यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या तिन्ही याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. के. के. सोनवणे यांनी निकाली काढल्या. याचिकाकर्त्यांना निवडणूक याचिके चा पर्याय उपलब्ध असल्याने खंडपीठाने वरील याचिका निकाली काढल्या. याचिकाकर्त्यांना निवडणूक याचिका अथवा इतर कायदेशीर कार्यवाही करण्याची मुभा राहील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर पाच स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया २० मे २०१५ रोजी सुरू झाली. नामनिर्देशनपत्र स्वीकारल्यावर महापालिका आयुक्तांच्या शिफारशीनंतर ३० मे रोजी पाच स्वीकृत सदस्यांची निवड झाली. मात्र, पालिका नियमांचे उल्लंघन करून अपात्र उमेदवारांची निवड झाल्याने ही निवड रद्द करावी, अशी विनंती करणाऱ्या याचिका राजेंद्र दाते पाटील, डॉ. आशा बिनवडे, लतिका नरवडे यांनी दाखल करून स्वीकृत सदस्य कचरू घोडके, बंटी तनवाणी, सुनीता आऊलवार, चेतन कांबळे व अॅड. एटीएके शेख यांच्या निवडीला आव्हान दिले होते. स्वीकृत सदस्यांची निवड करताना सर्वसाधारण सभेमध्ये कायद्याने विहित केलेल्या पद्धतींचे व नियमांचे पालन केलेले नाही. अनेक उमेदवारांनी अपूर्ण नामनिर्देशनपत्र दाखल केलेले असल्याचा शेरा आयुक्तांनी नोंदविलेला आहे. प्रत्येक प्रवर्गातून एका उमेदवाराची निवड न करता एकाच प्रवर्गातून सर्वांची नियुक्ती करणे ही बाब बेकायदेशीर असल्याने ती रद्द ठरवावी व नव्याने स्वीकृत सदस्य निवडण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकांमध्ये केली होती. गुरुवारी याचिकाकर्त्यांना निवडणूक याचिका दाखल करण्याचा पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याने तिन्ही याचिका निकाली काढल्या. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. मधुर गोलेगावकर, अॅड. संतोष जाधवर यांनी, सदस्यांतर्फे अॅड. प्रदीप देशमुख, अॅड. देवदत्त पालोदकर, अॅड. राजेंद्र देशमुख आणि महापालिकेतर्फे अॅड. अतुल कराड यांनी काम पाहिले.
स्वीकृत सदस्यांच्या निवडीस आव्हान देणाऱ्या याचिका निकाली
By admin | Updated: July 22, 2016 00:46 IST