ईट : शेतकऱ्यांची नाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागेसाठी रविवारी तब्बल ९४ टक्के एवढे मतदान झाले. सोमवारी मतमोजणी होणार आहे.जवळपास १९८५ साली स्थापन झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न दोन ते अडीच लाख एवढे आहे. अनेक वर्षांपासून बाजार समितीवर प्रशासक राहिल्याने बाजार समिती आर्थिकदृष्ट्या फारशी सक्षम नाही. तब्बल २५ वर्षानी बाजार समिती निवडणूक झाली. राष्ट्रवादीसोबतच सेना-भाजप या दोन्ही पक्षांकडून निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. तसेच यांना काँग्रेसचीही साथ मिळाली. या तिघांनी एकत्र येथे आलमप्रभू शहर विकास आघाडी स्थापन करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाणगंगा शेतकरी विकास पॅनलसमोर आव्हान उभे केले होते. दोन्ही पॅनलच्या नेत्यांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. दरम्यान, रविवारी १७ जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सोसायटी मतदार संघातून ११ जागेसाठी ६२४ पैकी ५८२ जणांनी मतदानाचा हक्क बजाविला. याचे प्रमाण ९३ टक्के एवढे आहे. तसेच ग्रामपंचायत मतदार संघाच्या ४ जागेसाठी ५७९ पैकी ५५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. याचे प्रमाण ९५ टक्के एवढे आहे. व्यापारी मतदार संघातील दोन जागेसाठी मतदान झाले. ४९ पैकी ४७ जणांनी मतदानाचा हक्क बजाविला. निवडणूक प्रचारादरम्यान दोन्ही पॅनलकडून ताकद लावण्यात आली होती. त्यामुळे बाजार समितीच्या चाव्या कोणाच्या हाती येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सोमवारी भूम येथील जिल्हा परिषद शाळेत मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
‘कृउबास’साठी ९४ % मतदान
By admin | Updated: April 25, 2016 00:36 IST