लोकमत न्यूज नेटवर्ककेज : काळ्या बाजारात जाणारा ८२० पोती तांदूळ पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडला. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी बीड-मांजरसुंबा रस्त्यावर करण्यात आली. या कारवाईत तांदूळ, ट्रक असा ४० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धाडसी कारवाईने खळबळ उडाली आहे.सोलापूर येथील रेशनचा तांदूळ दोन ट्रकमधून (जीजे १०-टीव्ही ६८४७, जीजे १८- एयू ७८५६) गुजरात येथील काळ्या बाजारात जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक यांना मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी सापळा लावला. बीड शहरातून या ट्रक मांजरसुंबामार्गे जात असल्याचे दिसताच पथकाने आपली पोलीस व्हॅन आडवी लावून दोन्ही ट्रक ताब्यात घेतल्या. या दोन ट्रकमध्ये तब्बल ८२० पोती तांदूळ असल्याचे समोर आले. चव्हाण यांच्या टीमने हा सर्व तांदूळ नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन केला. तसेच दोन ट्रकही ठाण्यात लावण्यात आल्या. या कारवाईत १६ लाख ४० हजार रूपयांच्या तांदळासह दोन ट्रक असा ४० लाख ४० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, शरद कदम, राशेद पठाण, राहुल शिंदे, संतोष काळे, चालक राजेंद्र राख यांनी केली.
८२० पोती तांदूळ पकडला
By admin | Updated: July 5, 2017 00:25 IST