औरंगाबाद : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत औरंगाबाद शहरातील सर्वसामान्य गरीब नागरिकांनी हजारो रुपये खर्च करून महापालिकेने नेमून दिलेल्या संगणक केंद्रांवर मोठ्या आशेने अर्ज दाखल केले. मागील दोन महिन्यांपासून हे सर्व अर्ज महापालिकेतच पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागरिकांनी दाखल केलेले अर्ज राज्य शासनामार्फत केंद्राकडे जातील, या बाबतीत मनपाने चुप्पी साधली आहे. अर्ज दाखल केलेल्या नागरिकांचे डोळे आता अनुदानाकडे लागले आहेत.केंद्र शासनाने पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. या योजनेत ‘प्रत्येक नागरिकाला घर’ असे घोषवाक्यच तयार करण्यात आले आहे. या योजनेची शहरी भागात अंमलबजावणी करण्यासाठी मनपाची निवड करण्यात आली आहे. औरंगाबाद महापालिकेनेही मोठा गाजावाजा करून योजनेचा शुभारंभ केला. नागरिकांना अर्ज भरण्यासाठी शहरातील खाजगी संगणक केंद्रांची मदत घेण्यात आली. इंटरनेट कॅफे चालविणाऱ्यांनी अवाच्या सव्वा दर आकारून नागरिकांकडून अर्ज भरून घेतले. काही दलालांनी अर्ज भरण्यासाठी गरीब नागरिकांकडून हजारो रुपये उकळले. अवघ्या दीड महिन्यात शहरात ८० हजार ५५४ नागरिकांनी अर्ज भरले. शहरातील सर्व इंटरनेट कॅफेचालकांनी हे अर्ज मनपाकडे स्वाधीन केले.मागील दोन महिन्यांपासून नागरिकांचे अर्ज महापालिकेत धूळखात पडले आहेत. या अर्जाची तपासणी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. हे अर्ज स्कॅन करून राज्य शासनामार्फत केंद्राकडे कधी पाठविण्यात येतील याचा निश्चित कालावधीच ठरलेला नाही.
घरकुल योजनेचे ८० हजार अर्ज पडून
By admin | Updated: October 13, 2016 01:04 IST