पुणे शहरातील रस्त्यालगत फुटपाथवर असलेल्या ड्रेनेजच्या मॅनव्होलमध्ये पडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे़ याचा बोध लातूर मनपाने घेतला नसून, लातूर शहरातील गटारींवरील फुटपाथवर ७९ मॅनव्होलचे झाकण गायब झाले आहेत़ ७९ मॅनव्होल उघडे आहेत. त्यात पडून अपघात झालेले अनेक उदाहरणे आहेत़ ‘लोकमत’च्या चमूचा रविवारी दिवसभर सर्व्हे सुरु असताना फळ मार्केट येथील मॅनव्होलमध्ये पडून दोघेजण जखमी झाल्याची घटनाही घडली़ काही दिवसांपूर्वी गुळ मार्केटच्या फुटपाथवर मॅनव्होलमध्ये दुचाकी अडकली होती. दुचाकी काढण्यासाठी दिवसभर कसरत करावी लागली. तरीही मनपाचे दुर्लक्ष आहे.लातूर शहरातील ५ नंबर चौक ते विवेकानंद चौकापर्यंत एकूण ३५० मॅनव्होल आहेत़ त्यापैकी ५५ मॅनव्होल उघडे आहेत. रेणापूर नाका ते राजीव गांधी चौकापर्यंत १८० मॅनव्होल आहेत. त्यापैकी २४ मॅनव्होल उघडे आहेत. या उघड्या मॅनव्होलमध्ये पडून दररोज अपघात होतात. पण त्याकडे मनपाचे दुर्लक्ष आहे. रविवारी सकाळी १२. ३० वाजता बार्शी रोड ५ नंबर चौकापासून हे सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले. या दरम्यान एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या जवळ असलेल्या फुटपाथवर मॅनव्होलचे झाकण आहे मात्र ते फुटपाथपेक्षा अधिक उंच असल्यामुळे पादचाऱ्यांना हे अडथळ््याचे आहे. मॅनव्होलच्या झाकणावर असलेल्या कोंड्या या अधिक घातक आहे. पुढे एमआयडीसी कॉर्नर जवळ कोपऱ्यात गटारच उघडी आहे. त्याही पुढे गेल्यानंतर पाण्याच्या टाकीजवळ रस्त्याच्या कडेलाच ही गटार उघडी आहे. रात्रीच्या वेळी येथे वाहनाचा अपघात होण्याची भीती आहे. पुढे शिवाजीचौकातील जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्या गटारींवर एकूण १५ मॅनव्होल झाकन नाहीत. शिवाजी चौकातील कोपऱ्यातील गटार पुर्णत: उघडी आहे़ या ठिकाणी सकाळी कामगारांचा ठिय्या असतो. परिणामी येथे ही उघडी गटार धोकादायक आहे. या गटारींवर फुटपाथसाठी वापर करण्यात आला आहे. परिणामी या फुटपाथवरुन नागरिकांना आता चालने मॅनव्होलमुळे धोक्याचे बनले आहे. रात्रीच्यावेळी तर हे मॅनव्होल अत्यंत धोकादायक आहेत़ फुटपाथ पादचाऱ्यांसाठी आहेत़ परंतू त्यावर मॅनव्होल आहेत़ त्यातील काही नादुरुस्त व खिळखिळे झालेले असून, काही मॅनव्होल उघडे आहेत़ त्यामुळे हा धोका वाढला आहे़ काही दिवसांपूर्वी गुळ मार्केट येथील मॅनव्होलमध्ये एक दुचाकी अडकली होती़ तिला यातून काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली़ पाच नंबर चौक, शिवाजी चौक, गांधी चौक, गंजगोलाई, शाहू चौक आणि विवेकानंद चौक या मार्गावर जवळपास एकूण ३७५ मॅनव्होल आहेत. यापैकी तब्बल ५५ ठिकाणचे मॅनव्होल कव्हरच गायब झाले आहेत. रस्त्याच्या खालून गेलेल्या मोठ्या गटारीवरील हे झाकण काही ठिकाणी गायब झाल्यामुळे मोठ्या अपघाताची भीती वाहनधारक पवन सेलुकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. तर अण्णा भाऊ साठे चौकातील हे ठिकाण अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित आहे. पाच नंबर ते विवेकानंद चौक आणि गावभागातील २६ टक्के मॅनव्होल कव्हर गायब असल्याचे ‘लोकमत’च्या सर्व्हेक्षणात पुढे आले आहे.गांधी चौकातून पोस्ट आॅफिसच्या पाठीमागून जात असताना कोपऱ्यावर ड्रेनेजच्या मॅनव्होलचे झाकण खचले आहे. येथे अनेक वाहनांचे अपघात झाले आहेत. गावभागात जुन्या पध्दतीने ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या भागातील काही गटारी सताड उघड्या असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. सुभाष चौक, राम गल्ली, सिध्देश्वर वेस, हत्तेगनर, गंजगोलाईतील पाठीमागच्या भागातील काही ठिकाणी गटारीवरील मॅनव्होल गायब आहेत. विशेष म्हणजे या मॅनव्होल कव्हर अभावी अनेकदा पायी चालणारी व्यक्ती मध्ये पडल्याचे, जखमी होण्याचे प्रकार झाले आहेत. याबाबत संबंधित प्रशासनाला अनेकदा तक्रारी करुनही हे मॅनव्होलचे झाकण बसविले जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.नवीन रेणापूर नाका ते शिवाजी चौक आणि पुढे राजीव गांधी चौकापर्यंतच्या गटारीवरील मॅनव्होलचे झाकण अनेक ठिकाणी गायब झाले आहे. या गटारीवरील फुटपाथवरुन नागरिकांना चालणे म्हणजे अपघाताला निमंत्रणच आहे. दुपारी १२.३० वाजता या सर्व्हेक्षणास सुरुवात झाली. शिवाजी चौक ते राजीव गांधी चौकापर्यंत ४ वाजेपर्यंत हे सर्व्हेक्षण करण्यात आले. या मार्गावर दुतर्फा बाजूवर एकूण २४ ठिकाणी मॅनव्होलचे कव्हर गायब झाले आहेत. शिवाजी चौक ते रेणापूर नाका या दरम्यान २ ठिकाणी, रेणापूर नाका ते शिवाजी चौक ४ ठिकाणी, शिवाजी चौक कॉर्नर उघडाच आहे. तर राजीव गांधी ते शिवाजी चौक येथे १० ठिकाणी या गटारींवरील मॅनव्होलचे झाकण गायब झाले आहे. या मार्गावरील ११३ पैकी २४ ठिकाणी मॅनव्होलचे झाकण नसल्याचे समोर आले आहे. या मार्गावर २२ टक्के मॅनव्होलचे झाकण गायब झाले आहेत.
फुटपाथवरील ७९ मॅनव्होलचे ‘झाकण’ गायब
By admin | Updated: November 29, 2015 23:18 IST