औरंगाबाद : मराठवाडा विभागात १ जून २०१४ ते २० मे २०१५ पर्यंत नियमित पावसाळ्यात आणि अवकाळी पावसामुळे ६९ जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करण्यासंबंधीचे नियोजन मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक झाली. यावेळी सर्व यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते.मागील ११ महिन्यांत पावसाळा संपल्यानंतरही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विभागात मोठ्या प्रमाणात शेतीमालासह जीवित हानी झाली. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत विचारमंथन झाले. बैठकीला विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, ब्रिगेडिअर मनोज कुमार, कर्नल ए.के.दत्ता, जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग, जालन्याचे जिल्हाधिकारी ए.एस.आर नायक, नांदेडचे सुरेश काकाणी, लातूरचे पांडुरंग पोले, परभणीचे राहुल रंजन महिवाल, बीडचे नवल किशोर राम, हिंगोलीचे प्रभारी जिल्हाधिकारी राम गगराणी, पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सी.ए.बिराजदार, सर्व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभाग, ऊर्जा, आरोग्य, दूरसंचार, नगरप्रशासन इ. विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर यांनी विभागातील एकूण पूर्वतयारीचे सादरीकरण केले. विभागातील सर्व धरणांशी निगडीत माहिती संगणक संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्याचे बिराजदार यांनी सांगितले. विभागात २००५ आणि २००६ मध्ये पूर परिस्थिती उद्भवली होती. गेल्या दोन वर्षांत अपुरा पाऊस झाला आहे. मात्र त्याचा परिणाम पूर्वतयारीवर होऊ नये. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात नेहमीप्रमाणे नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले जावेत. सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परांशी सातत्यपूर्ण संपर्क व समन्वय ठेवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांनी बैठकीत केले.
मराठवाड्यात वर्षभरात विजेचे ६९ बळी
By admin | Updated: May 26, 2015 00:49 IST