औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीतील रस्ते खोदून फोर-जी इंटरनेट सेवेचे केबल टाकण्यासाठी रिलायन्स इन्फो. कंपनीने पालिकेला परवानगीसाठी ४० कोटी रुपये दिले. ती रक्कम पालिकेने कंत्राटदारांची देणी आणि वेतनासाठी खर्चून टाकली, वर्षभरात मनपाने ६१ कोटी रुपये कंत्राटदारांना देऊनही शहरातील अनेक रस्ते खड्ड्यात गेले आहेत. मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांनी स्थायी समितीच्या बैठकीत ९ कंत्राटदारांना ६१ कोटी ५३ लाख रुपये एप्रिल २०१३ पासून आजवर दिल्याचे सांगितले. या रकमेतून कोणकोणत्या रस्त्यांची कामे झाली आहेत, याची यादी मात्र प्रशासनाला देता आली नाही, त्यामुळे सभापती वाघचौरे यांनी रस्ते, खर्च आणि कंत्राटदाराची यादी सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. २७२ कि़मी. रस्ते खोदून केबल टाकण्याच्या कामासाठी रिलायन्स कंपनीने पालिकेला ४० कोटी रुपये दोन टप्प्यांत दिले. कंपनीने परवानगीपेक्षा जास्त रस्ते खोदले आहेत. रस्त्यांच्या डागडुजीसाठी ती रक्कम होती; परंतु मनपा लेखा विभागाने तत्कालीन आयुक्तांच्या आदेशाने ती रक्कम कंत्राटदारांची देणी व वेतन अदा करण्यासाठी खर्च केली. फिरदौस फातेमा यांनी किराडपुरा रस्त्याच्या कामासाठी आंदोलनाचा इशारा दिला. जहाँगीरखान, काशीनाथ कोकाटे यांनी सांगितले की, आयुक्तांनी अभियंत्यांची तातडीने बैठक घेऊन रखडलेली कामे मार्गी लावावीत.
६१ कोटींचा चुराडा होऊन शहर खड्ड्यांत
By admin | Updated: December 12, 2014 00:55 IST